मुंबई,ता.3 : रिपब्किन ऐक्याचे आणि रिपब्लिकन मतांच्या परिणामाची कोणी कितीही चेष्टा केली तरी रिपब्किन राजकारणाच्या निळ्या झेंड्याचा आधार घेतल्या शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला सुरक्षित वाटत नाही. असंख्य गटांमध्ये विभागलेल्या रिपब्लिकन चळवळीचे प्रतीक "निळा झेंडा'च असल्याने त्यातल्या कोणत्याही गटाने अध्याप वेगळा रंग घेतलेला नाही. त्यामुळे एखादा कार्यकर्ता आणि त्याचे लेटरहेड एवढ्याच बळावर खांद्यावर निळा झेंडा घेतलेला एखादा गट नेता तरी आपल्या सोबत असावा यासाठी सर्वच पक्षाचे प्रयत्न सुरू असतात. या निवडणुकीतही शिवसेनेसह सर्व पक्षांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये निळा झेंडा दिसतो तो त्यामुळेच.
दलित आणि विशेषतः आंबेडकरी समाजाला सोबत घेतल्या शिवाय निवडणुकांचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. पाच ते सहा टक्के मतदान असणाऱ्या या समाजाला वगळल्यास त्याच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू शकतो. याची जाणीव कॉंग्रेस आघाडीसह शिवसेना- भाजप यांना सुद्धा आहे. त्यामुळेच लहान मोठ्या रिपब्लिकन गटांना सोबत घेऊन आपण सर्वसमावेशक राजकारण करीत असल्याचे दाखविण्याचा डाव्यांपासून उजव्यांपर्यंत प्रत्येकाचाच प्रयत्न असतो.त्यासाठी आपल्या आघाडी वा युतीसोबत निळा झेंडा नावापुरती का होईना पण हवा, असा प्रत्येकाचाच आग्रह असतो. त्याची तरतूद सर्व राजकीय पक्षांनी याही निवडणुकीत केली आहे.
रिपब्लिकन पक्षाला सोबत घेण्याची सुरूवात कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. रिपब्लिकन पक्षाचे नेते दादासाहेब गायकवाड यांना त्यांनी सोबत घेतले. तेथूनच रिपब्लिकन पक्ष व कॉंग्रेसची सलगी झाली. पुढे . रिपब्किन चळवळीतील ज्येष्ठ नेते व बिहारचे राज्यपाल रा.सु. गवई यांनी कॉंग्रेसशी दोस्ती केली .ती आज ही आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामदास आठवले यांना सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे चालवला. रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड, गवई, ऍड. प्रकाश आंबेडकर, आठवले या मोठ्या नेत्यांनी कॉंग्रेसशी वेळोवेळी घरोबा केला.
यावेळी रामदास आठवले यांनी ऐक्याचा नारा दिल्याने सारे रिपब्लिकन गट निळ्या झेंड्याखाली एकत्रित राहतील अशी अपेक्षा होती मात्र याही ऐक्याची फाटाफूट झाली आणि रिपब्लिकन गट आपापल्यापरीने रिपब्लिकन पक्षाचे निळे झेंडे घेऊन कॉग्रेस आघाडी आणि युतीच्या तंबूत डेरेदाखल झाले.
ऐक्यातून फुटून डॉ. राजेंद्र गवई कॉंग्रेसच्या तंबूत शिरले . त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारसभा आणि रथावर पंजा आणि घड्याळासह रिपब्लिकनचा निळा झेंडा फडकू लागला. तर तानसेन ननावरे, अनिल कांबळे हे रिपब्लिकन नेते शिवसेनेच्या तंबूत शिरले. त्यामुळे युतीकडे शिवशक्ती- भिमशक्तीचा प्रयोग झाल अन् युतीलाही रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याची सोय झाली. तिसऱ्या आघाडीसोबत आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे असल्याने सध्या या तीनही प्रमुख प्रतिस्पर्धी आघाड्यांकडे रिपब्लिकनचा "निळा झेंडा' ही एक कॉमन गोष्ट दिसते.
..............
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment