रिपब्लिकनची पाटी कोरी; आठवलेंच्या नेतृत्वाचा फुगा फुटला
मुंबई, ता. 22 : विविध एक्झिट पोलचे अंदाज चुकवीत रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीने 11 जागांवर विजय मिळविला आहे; मात्र मुंबईत रिडालोसचे पुरते पानिपत झाले. रिडालोसचा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेडला एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे माजी खासदार व रिडालोसचे निमंत्रक रामदास आठवले यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
समाजवादी पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाची कामगिरी या वेळी उंचावली आहे. अलिबाग मतदारसंघातून शेकापच्या मीनाक्षी पाटील, उरणमधून विवेक पाटील, सांगोलातून गणपतराव देशमुख, पेणमधून धैर्यशील पाटील विजयी झाले असून, पनवेलची जागा मात्र शेकापला राखता आली नाही. भिवंडी-पूर्व व शिवाजीनगर येथून समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि भिवंडीतून रशीद मोमीन व शरद गावीत यांनी नवापूर मतदारसंघात विजय मिळविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात निर्माण केलेली हवा फारशी टिकली नाही. केवळ पंढरपूर मतदारसंघात "स्वाभिमानी'च्या भारत भालके यांना विजय मिळाला; स्वाभिमानीला इतर ठिकाणी अपयश आले.
भाकपच्या डहाणू येथील राजाराम ओझरे यांना विजय मिळाला; तर आमदार जीवा पंडू गावीत व आमदार नरसय्या आडम यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे बाबासाहेब पाटील हे अहमदपूरमधून विजयी झाले आहेत. रिडालोसने पाठिंबा दिलेले बार्शीतून दिलीप सोपल, वर्ध्यातून सुरेश देशमुख, माळशीरमधून उत्तम जाणकर यांनी विजयश्री खेचून आणली.
रिपब्लिकनची पाटी कोरीच
रिडालोसमधील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेडला आपले खातेही खोलता आले नाही. रिपब्लिकनने 107 जागांवर उमेदवार उभे केले होते. मुंबई आणि उपनगरातील बहुतांशी जागांवर रिपब्लिकनचे उमेदवार उभे होते; मात्र त्यांना तिसरा क्रमांकही गाठता आला नाही. सर्वच ठिकाणी त्यांना मतदारांनी अस्मान दाखविले. गाजावाजा करीत झालेल्या रिपब्लिकन ऐक्यावर दलित मतदारांनी विश्वास दाखविलेला नाही. कॉंग्रेसला धडा शिकविण्याची भाषा करणाऱ्या माजी खासदार रामदास आठवले यांच्यासह सर्वच रिपब्लिकन नेत्यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. "पैसा आणि वेळ कमी पडल्याने रिडालोसला यश मिळाले नाही', अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. जनतेला तिसरा पर्याय देण्याची भाषा करणाऱ्या रिडालोसला मनसेएवढेही यश मिळविता आले नाही.
बसपला नाकारले
मायावतींच्या बहुजन समाज पक्षालाही खाते खोलता आले नाही. मुंबईवर बसपने लक्ष केंद्रित केले होते; मात्र बसपच्या पदरी निराशाच पडली आहे. मायावतींच्या हत्तीला महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले आहे.
-----------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment