मुंबई, ता. 16 : वीरमाता जिजाबाई तंत्रशिक्षण संस्थेचे (व्हीजेटीआय) अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. के. जी. नारायणखेडेकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
"व्हीजेटीआय'ला सन 2004 मध्ये स्वायत्तता मिळाली होती. या कालावधीत संस्थेची कामगिरी समाधानकारक आहे. संस्थेची स्वायत्ततेची पाच वर्षांची मुदत संपली आहे. सहा वर्षांच्या आत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुदतवाढ अपेक्षित आहे. स्वायत्त विद्यापीठ म्हणून पाच वर्षे काम केल्यावर शिक्षण संस्था "अभिमत विद्यापीठा'चा दर्जा मिळविण्यास पात्र ठरते. "व्हीजेटीआय'ने पात्रता पूर्ण केल्याने अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी संस्थेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिक्षण संस्थेतील प्राध्यापकांची एक समिती हा प्रस्ताव तयार करण्यात गुंतली आहे. हा प्रस्ताव मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकार यांच्यामार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाला सादर केला जाणार असल्याचे डॉ. नारायणखेडेकर यांनी सांगितले.
व्हीजेटीआय सध्या मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. संस्थेच्या कामकाजाची माहिती मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारला द्यावी लागते; मात्र अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास व्हीजेटीआयला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान मिळू शकेल. स्वत:च्या संकल्पना राबविता येतील, शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना स्वत:च्या संस्थेची पदवी देता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुदान मिळाल्याने शिक्षण संस्थेच्या विकासाला वेग येऊ शकेल. राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांचा शिक्षणसंस्थेत थेट हस्तक्षेप राहणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
..............
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment