ंमतदारसंघाच्या पुनर्रचनेत कुर्ला विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मिळून चांदीवली मतदारसंघ तयार झाला आहे. पवई आय.आय.टी., पंचकुटी, हिरानंदानी, कुर्ला जरीमरी, मिलिंद नगर, असल्फा व्हिलेज आदी भाग या मतदारसंघात येतो. कुर्ला मतदारसंघातून कॉंग्रेसचे आरिफ नसीम खान दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीतही येथील मतदारांनी कॉंग्रेसच्या पारड्यात मताचे दान भरभरून टाकले होते. हे पाहता, विधानसभा निवडणुकीतही येथे कॉंग्रेसचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसचे वर्चस्व असणारा कुर्ल्यातील बहुतांश भाग चांदीवली मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यामुळे या वेळी आरिफ खान यांनी चांदीवलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2004 च्या निवडणुकीत खान यांना एक लाख 19 हजार 612 मते मिळाली होती. एकूण मतांच्या 55.36 टक्के ही मते होती; तर शिवसेनेच्या दत्ताराम गुजर यांना एकूण मतांच्या 35.69 टक्के मते मिळाली होती. खान यांना या वेळी शिवसेनेच्या दत्ताराम गुजर या पारंपरिक उमेदवाराऐवजी नव्या दमाच्या उमेदवार चित्रा सांगळे यांचा सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक नगरसेवक दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला चांदीवलीत 25 हजार 368 मते मिळाली होती. शिवसेना-भाजप युतीच्या मतांच्या वाट्यात मनसे भागीदार झाल्याने युतीची लोकसभा निवडणुकीत युतीची पीछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवार सांगळे यांना बसण्याची शक्यता आहे. मनसे आणि शिवसेनेच्या काटाकाटीच्या राजकारणात कॉंग्रेसचा फायदा होण्याची चिन्हे आहेत. मनसेचे उमेदवार दिलीप लांडे हे स्थानिक नगरसेवक असल्याने ते लक्षणीय मते घेतील, असा अंदाज आहे.
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीकडून सहदेव खटके यांनी आपले दंड थोपटले आहेत. खटके हेही नवखे उमेदवार आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या विरोधात व दलित, अल्पसंख्याकांच्या हिताचा सूर आळवीत "रिडालोस'ने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. मात्र येथील बहुसंख्य मुस्लिम, दलित मतदार हा कॉंग्रेसचा परंपरागत पाठीराखा आहे. शिवाय कॉंग्रेसचा उमेदवारही मुस्लिम समाजातील असल्याने "रिडालोस'चा कॉंग्रेसवर फारसा परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही.
येथे बहुजन समाज पक्षानेही आपला उमेदवार दिला आहे; मात्र येथे खरा सामना कॉंग्रेस, मनसे व शिवसेना यांच्यातच होणार आहे. बसपने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. त्यामुळे नसीम खान यांना बसप काही प्रमाणात उपद्रवी ठरेल, इतकेच. मतदारसंघात अनुसूचित जाती-जमातींचे सुमारे 20 हजार मतदार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे पाच टक्के, तर अनुसूचित जमातीचे 0.61 टक्का मतदार आहेत. येथील निकाल फिरविण्याची ताकद मुस्लिम मतदारांमध्ये आहे. उत्तर भारतीय व अन्य समाजांचे मतदार मात्र तुलनेने कमी आहेत. या गोष्टी आणि कॉंग्रेसचा प्रभाव, मनसे फॅक्टर या बाबी लक्षात घेता, ही निवडणूक सध्या तरी कॉंग्रेससाठी सोपी असल्याचे दिसून येत आहे.
...................
चौकट :
एकूण मतदार
तीन लाख 46 हजार 866
पुरुष मतदार -
दोन लाख 7 हजार 971,
महिला -
ेएक लाख 38 हजार 835
------------------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment