Wednesday, December 23, 2009

पक्षाच्या यशासाठी "त्यांनी' त्यागली पादत्राणे!

ंमुंबई, ता. 3 : सत्ता आणि पैसा यांच्याभोवती फिरणाऱ्या राजकारणात निष्ठावंत कार्यकर्ते दुर्मिळ झालेले असतानाच, मुंबईतील एका शिवसैनिकाने व मनसैनिकाने आपापल्या पक्षाच्या यशासाठी अनवाणी फिरण्याची प्रतिज्ञा करून अद्यापही पक्षनिष्ठेची बेटं कायम असल्याचे दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीतील यशासाठी अनेक उमेदवारांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत, तर दुसऱ्या बाजूला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नवस आणि प्रतिज्ञांचे अस्त्र घेऊन स्वतःला निवडणुकीच्या रणसंग्रामात झोकून दिले आहे.

शिवसेनेचे वरळी शाखाप्रमुख अरविंद भोसले यांनी, नारायण राणे यांचा पराभव झाल्याशिवाय पादत्राणे घालणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाच केली आहे. महसूलमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला आव्हान देत केलेली बंडखोरी त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी सांगितले, की ""कणकवलीच्या पोटनिवडणुकीत राणे यांच्या दहशतीचा सामना मी केला. त्यांची दहशत संपविण्याची शपथ मी घेतली आहे''.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मला नगरसेवकपदाची उमेदवारी देऊ केली होती; पण मी ती नाकारली. गेली दोन वर्षे मी अनवाणी फिरत आहे. माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मी कणकवलीचे तालुका संपर्कप्रमुखपद पक्षाकडे मागून घेतले.'' या वेळी कुडाळमध्ये राणे यांचा पराभव होईल आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण होईल, अशी आशा भोसले व्यक्त करतात.

घाटकोपर येथील तृतीय पंथीयांच्या संघटनेचे अध्यक्ष जतिन यांनी, मनसेची सत्ता येईपर्यंत अनवाणी राहण्याची शपथ घेतली आहे. घाटकोपर (पश्‍चिम) येथील भटवाडीलगत राहणाऱ्या जतिन आणि त्यांचे गुरू रवींद्र साळवे यांना राज ठाकरे यांच्या मनसेची सत्ता यावी, असे मनोमन वाटते. जतिन यांनी राज यांची भेट घेऊन तृतीयपंथी आणि देवदासी यांच्या समस्या मांडल्या होत्या. जतीन सांगतात, की देवदासींना मासिक वेतन, रेशनकार्ड, मतदानाचा अधिकार देण्याचे आश्‍वासन राज यांनी दिले आहे. त्यामुळेच मनसेची सत्ता यावी, अशी आमची इच्छा आहे. आदिमाया शक्तीला यासाठी साकडे घातले असून, मनसेची सत्ता येईपर्यंत देवीला अभिषेक करणार नाही आणि पादत्राणे घालणार नाही, अशी प्रतिज्ञा या नवरात्रोत्सवात आपण केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
..............................

No comments: