शाळेभोवती तळे साचून बच्चेकंपनीला सुट्टी!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 8 : सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, अशी आपल्या बोबड्या शब्दांत भोलानाथाकडे विचारणा करणाऱ्या बच्चेकंपनीच्या शाळेभोवती आज खरेच तळे साचले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सुट्टीचे गिफ्ट मिळाले. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने शाळा भरल्या नाहीत. तर काही शाळा तत्काळ सोडण्यात आल्या. त्यामुळे शाळेच्या वाटेवर रस्त्यात साचलेल्या पाण्यातून दंगामस्ती करीत घराकडे जाताना विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला पुन्हा एकदा जलमय केले. दक्षिण मुंबईत जागोजागी पाणी साचले होते. वडाळा, परळ, दादर, भायखळा, माझगाव, काळाचौकी आदी भागातील रस्ते बुडाले होते. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली, तर काही ठिकाणी शाळा भरल्यानंतर त्या तत्काळ सोडण्यात आल्या. आपल्या आई-बाबांचे बोट धरून रस्त्यात तुंबलेल्या पाण्यातून घराकडे निघालेले विद्यार्थी जागोजागी दिसत होते. काही अल्लड आणि खोडकर विद्यार्थ्यांनी पाण्यातच खेळ सुरू करून धम्माल केली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवीत खेळणाऱ्या या विद्यार्थ्यांना पाठीवरील दप्तर आणि शाळेचा गणवेश, छत्री याचेही भान राहिले नव्हते. भोलानाथने त्यांचे आर्जव मान्य करून दिलेल्या सुट्टीचा पावसात भिजून त्यांनी मनमुराद आनंद घेतला.
No comments:
Post a Comment