Saturday, July 25, 2009

मान्सून आला तरी "तहान' कायम!

मान्सून आला तरी "तहान' कायम!

टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या झाली दुप्पट

योगेश पवार ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 26 : मान्सूनचा पाऊस दाखल झाला असला तरी राज्यातील पाणीटंचाईने सरकार आणि जनतेच्या नाकीनऊ आणले आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या गतवर्षाच्या तुलनेत जूनअखेरपर्यंत दुप्पट असून, या आठवड्याअखेरीस राज्यातील दोन हजार 467 गावे आणि दोन हजार 884 वाड्यांत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त भागाची तहान भागविण्यासाठी हजारो टॅंकर्स युद्धपातळीवर कार्यरत असून, तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत 55 कोटी 49 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यातील मराठवाडा व कोकण विभागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले. त्यानंतर राज्यातील पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. मान्सून दाखल झाला असला तरी चालू आठवड्याच्या अखेरीस दोन हजार 467 गावे आणि दोन हजार 884 वाड्या पाण्यासाठी तहानलेल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत या आठवड्यात 100 गावांची आणि तीन वाड्यांची भर पडली आहे. विशेषतः औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांत भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांतील 965 गावे आणि 509 वाड्यांत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 530 गावे व 1043 वाड्या तहानलेल्या आहेत. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर येथील 122 गावे, 308 वाड्या आणि पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील 208 गावे, 910 वाड्यांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 423 गावे आणि 24 वाड्यांत तर नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पाणीटंचाई कमी आहे. टंचाईग्रस्त भागांना दोन हजार 119 टॅंकर व 44 बैलगाड्या अहोरात्र पाणीपुरवठा करीत आहेत.गतवर्षी 21 जूनअखेरीस एक हजार 548 गावे आणि 1036 वाड्यांमध्ये पाणीटंचाई हाती. या वर्षी मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाईची होरपळ वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जूनअखेरपर्यंत पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या दुप्पट झाली आहे. मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल झाला असला तरी काही भागांत तो अद्यापही कागदावरच आहे. तलाव क्षेत्रात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईचा आलेख वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.राज्यातील पाणीटंचाई 30 जूनअखेरपर्यंत राहील, असे गृहीत धरलेले असते; मात्र या वर्षी मान्सूनचा पाऊस लांबल्याने पाणीटंचाई जुलैअखेरपर्यंत टिकण्याची शक्‍यता असल्याचे मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.

.इन्फोबॉकस

पाणीपुरवठ्यासाठी झालेला खर्च (कोटीमध्ये) मराठवाडा - 12.97

अमरावती - 18.35

नागपूर - 6.27

कोकण - 5.63

नाशिक - 4.12

पुणे - 8.16

No comments: