सकाळ वृत्तसेवा
ंमुंबई, ता. 17 : लोकसभा निवडणुकीत राज्यात बहुजन समाज पक्षाचा हत्ती धुमाकूळ घालणार असा अंदाज होता; मात्र या पक्षाला राज्यात आपले खातेसुद्धा उघडता आलेले नाही. बसपचा हत्ती पराभवाच्या गर्तेत रुतल्याचे दिसत असले तरी 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी बसपच्या मतांच्या टक्केवारीत 3.35 टक्केवरून सहा टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसते. दलित, मुस्लिम आणि उत्तर भारतीयांनी ठेंगा दाखवल्याने मुंबईत "बसप' प्रभाव दाखवू शकली नाही. राज्यातील 21 मतदारसंघात "बसप' तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. मनसेच्या तुलनेत बसपला मिळालेली मते पाहता "हत्ती छाप' अजूनही राज्यातील जनतेला फारसा मान्य नसल्याचे दिसते. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटावर "हत्ती'ला आता आपली चाल बदलावी लागणार आहे.उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मायावतींना सत्तेचे सिंहासन बहाल करणाऱ्या "सोशल इंजिनिअरिंग'चा फॉर्म्युला महाराष्ट्रात फसला. त्यामुळे मायावतींची "माया' राज्यात चालली नाही. राज्यातील 47 मतदारसंघांत बसपने स्वबळावर उमेदवार उभे केले होते. एकाही जागेवर त्यांना विजय मिळविता आला नाही. या वेळी बसपने कोट्यधीश उमेदवार दिले होते. अन्य पक्षांतून आयात केलेल्या नेत्यांनाही उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी "बसप' बाजी मारेल, अशी हवा होती. बसपच्या नेत्यांचाही तसा दावा होता; मात्र विदर्भ, मराठवाड्यातील प्रमुख उमेदवारांना पाडण्याच्या भूमिकेतच बसप वावरल्याचे दिसून आले.बसप आणि मनसे सन 2004 च्या लोकसभा निवडणुकीत बसपला राज्यात सुमारे 10 लाख 30 हजार मते मिळाली होती. या वेळी त्यात वाढ होऊन ती 18 लाख इतकी झाली आहेत. मराठवाडा, विदर्भ, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आदी भागांत बसपच्या मतांमध्ये सुमारे दीड लाख मतांची वाढ झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यापुरतेच समाधान बसपला आहे. नवख्या मनसेच्या 12 उमेदवारांनी बसपच्या 47 उमेदवारांच्या तुलनेत पहिल्याच दणक्यात मिळवलेल्या मतांची टक्केवारी पाहता, बसपच्या राज्याच्या राजकारणातील मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.कॉंग्रेसच्या प्रचाराचा फटका गडचिरोली- चिमूर, वर्धा, हिंगोली, नागपूर, अहमदनगर या ठिकाणी बसपच्या उमेदवारांना एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली. राज्यात 21 ठिकाणी बसप तिसऱ्या स्थानावर राहिली. मुंबईतील उत्तर भारतीय आणि दलित व मुस्लिम मतांवर बसपची मदार होती. त्यासाठी भाईचारा मेळावे घेतले गेले; मात्र या मतदारांनी कॉंग्रेसच्या बाजूने कौल देत बसपला ठेंगा दाखविल्याने बसपचे मुंबईत पानिपत झाले. कॉंग्रेसची लाट आल्याने बसपला फटका बसला. तसेच दलित मुस्लिमांनी बसपला मते दिल्यास शिवसेना-भाजपचा फायदा होईल, असा प्रचार कॉंग्रेसने केल्याने त्याचा फटका बसल्याचा दावा बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी केला आहे. दरम्यान "सोशल इंजिनिअरिंग'चा झालेला विचका आणि उत्तर प्रदेशची राज्यात सर्व बाबतीत "कॉपी टू कॉपी' करण्याची भूमिका याचा फटका बसपला बसला असल्याचे दिसते.
........
17/5/09
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment