Saturday, July 25, 2009

ये रे घना ये रे घना...

ये रे घना ये रे घना...
माझ्या घराच्या खिडकीतून तो वाऱ्याबरोबर आत शिरतो म्हणून मी कधिचा खिडकीला प्लास्टिकचा कागद लावून ठेवला. आमच्या घराशेजारील दत्ताच्या मंदिरातही तो असाच अवचित घुसतो आणि जलाभिषेक करून जातो. दरवर्षीचा त्याचा हा नित्यक्रम. म्हणून पुजाऱ्यानेही त्या जागेवर मेन कापड लावून ठेवलेय. तू असा, साऱ्यांना त्रास देतोस खरा पण तू अगदी अवचित पावलांनी यावं आणि आमच्यासह झाडं, वेली, प्राणी अगदी सिमेंटच्या इमारतींनाही चिंब भिजवून टाकावेस असं वाटतं. म्हणूनच तुझी आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहतोय. होय अगदी अधीर झाले आहेत आम्ही तुझ्या आगमनासाठी. तू केव्हा येतोस? त्या वेध शाळेवाल्यांनी तुझ्या आगमनाची वर्दी दिलीय पण तू तुझ्या सवयीप्रमाणे त्यांना हुलकावणी दिलीसच. वेधशाळेला चकविण्यात आणि त्यांची हुर्ये उडविण्यात तुझा हातखंडाच आहे म्हणा. असो पण तुझं काय झालंय ? का रुसला आहेस ? गेले काही वर्षे अगदी मे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत अचानक हजर व्हायचास. आणि बेसावध असणाऱ्या नवरा, नवरीला मांडवात लग्न लागत असतानाच चिंब भिजवून काढायचा. पाऊस आला पाऊस आला म्हणत मग व्हराडाची एकच धावपळ उडायची. लोक तुझ्या नावाने बोटं मोडत. पण दुसरीकडे भीषण पाणी टंचाईने होरपळलेले असल्याने तुझ्या आगमनासरशी ते सुखावून जात. त्यांचा तो राग अगदीच लटका आणि तात्पुरता असायचा. ते तुलाही माहीत आहे. मग तू का रागावलायस ? अजून तुझा साधा शिडकावाही नाही किंवा तुझ्या येण्याची खबर देणारा वळीवाचा पाऊसही आला नाही. काय चुकले आमचे? आम्ही निसर्गावर केलेल्या आक्रमणाची शिक्षा तू आम्हाला देतोस? कदाचित तसेच असेल. आम्ही बेभान झालोय. निसर्गाच्या चक्रातील आम्ही एक़ इवलासा घटक आहोत हे विसरलो आहोत. बुद्धीच्या जोरावर निसर्गचक्रात ढवळाढवळ करून ते बिघडविण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कदाचित सारे विस्कळित झाले असावे. माफ कर आम्हाला. तू खरच आता धुवाधार बरस. फार अंत पाहू नको रे आमचा. गोठ्यातील जनावरेही पाठीवर तुषारांचा शिडकावा व्हावा म्हणून आसुसली आहेत. एव्हाना "जोत' शेतात फिरत असते. शेतकरी कुटुंबासह क्षणभर विश्रांतीसाठी बांधावर बसून भाकरीचा तुकडा मोडायचा. पण हे सारे थांबलेय तुझ्यासाठी . गावातील घरांना गवताची झडी बांधून पूर्ण झाली आहे. पावसाळी जळणासाठी लागणारे सर्पन घरात भरून झालेय. शेतमळ्या स्वच्छ करून झाल्या आहेत. विहिरीचा कोरडा तळ साफ करून ठेवला आहे. तुझ्या आगमनाने काळ्या कातळाला पाझर फुटेल. विहीर काठोकाठ भरून जाईल. खरं म्हणजे एव्हाना ती भरायला हवी होती. पण तू रुसला आहेस ना. विहिरीच्या काठच वडाच भलं मोठं झाड आणि त्यावर बसणारे पक्षी चातकाप्रमाणे तुझी आळवणी करीत आहेत. त्यांची तरी किमान पर्वा कर. ंबईत तू कोसळलास की, जागो जागी पाणी तुंबत. रेल्वे रस्ते जाम होतात. अशा वेळी तुझी चीड येते. पण खरं सांगू ती तेवढ्यापुरतीच. म्हणूनच 26 जुलैच्या भयंकर प्रलयानंतरही मुंबईकर तुझी तेवढ्याच आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. अगदी सिमेंटच्या इमरतींही क्षणभर शिडकाव्यासाठी कासावीस झाल्या आहेत. मग कधी येतोस...
.....योगेश पवार

No comments: