Saturday, July 25, 2009

चिमटे, कोपरखळ्या आणि मैत्रीची ग्वाही...!"

ंमुंबई, ता. 27 : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे एकमेकांचे राजकीय विरोधक. ते एका व्यासपीठावर आले की त्यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगते. राज्याच्या सीमा ओलांडून दिल्लीच्या तख्तावर दाखल झालेल्या या दोन्ही प्रभृती आज घरच्या व्यासपीठावर एकत्र आल्यावर त्यांच्यातील जुगलबंदीला उधाण आले आणि त्यातच पार पडला, मराठवाडा विकास मंचातर्फे यशवंत नाट्यमंदिरात आयोजित पुरस्कार सोहळा. मंचाच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांना "मराठवाडा भूषण' पुरस्कार देऊन आज विलासराव देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. एकमेकांना चिमटे काढीत, एकमेकांच्या टोप्या उडवितानाच दोघांनीही आपण राजकीय विरोधक असलो तरी एकमेकांचे मित्र असल्याची ग्वाही यानिमित्त दिली. स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल आणि श्रीफळ असे मुंडे यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप होते. विलासराव देशमुख यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. "मराठवाडा गौरव' पुरस्काराने पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, उद्योजक बी. बी. ठोंबरे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क खात्याच्या संचालिका श्रद्धा बेलसरे-खारकर, "चिंतामणी ज्वेलर्स'चे अरुण कायगावकर, हिमालयाची मोहीम सर करणारा प्रमोद राठोड, दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेली शिल्पा हिरेमठ आणि "सारेगमप' लिटील चॅम्पची विजेती कार्तिकी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या विनायक मेटेंनी हा सत्कार सोहळा आयोजित केला असला, तरी आरक्षणाची वा पक्षीय वादाची झालर सोहळ्यात नव्हती.सत्काराला उत्तर देताना गोपीनाथ मुंडे यांनी, आपल्या आईनेच केलेला हा सत्कार असल्याचे नमूद केले. ""ज्या ज्योतिषाला मी हात दाखवला त्याने मला केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. आपण केंद्रात गेलो तर विलासराव तेथेही पोहोचले. ते आता राज्यात नसल्यामुळे राज्यात परतायला हवे,'' असे मुंडे आधीच्या वक्‍त्यांच्या भाषणातील धागा पकडून म्हणाले. त्यावर आपल्या भाषणात विलासरावांनी, मुंडे यांनी आपला ज्योतिष बदलावा, असा सल्ला त्यांना दिला. ""मराठवाड्याच्या जनतेने आपल्याला प्रचंड मताने दिल्लीत पाठवले आहे. तेव्हा त्यांचा मान राखा, तेथेच राहा. भाजपमधील घडामोडी पाहता तुमची तिथे गरज आहे. येथे येऊनही काही फायदा नाही. सहा महिन्यांत स्थिती बदलणार नाही,'' अशी कोपरखळीही त्यांनी मारली. "गरज पडली तर मी आहे. मी अजून विधानसभेचाच सदस्य आहे,' असे सांगायलाही विलासराव विसरले नाहीत. त्यांच्या या विधानानंतर सभागृह हास्यकाल्लोळात बुडाले. "मुंडे यांना दीर्घायुष्य लाभो! विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द बहरत राहो' अशा शब्दांत विलासरावांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. बऱ्याच वक्‍त्यांनी विलासरावांचा उल्लेख आपल्या भाषणात "जड खात्याचे मंत्री' असा केला. तो धागा पकडत मुंडेंनी विलासरावांची फिरकी घेतली. "सोनियांची भेट घेऊन आपण यांचे खाते बदला' असे त्यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले.मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध नाही. आर्थिक निकषावर आरक्षण देण्यास आपला पाठिंबा असल्याचे मुंडेंनी या वेळी सांगितले.मुख्यमंत्र्यांवर टीकाकार्यक्रमाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण ऐनवेळी न आल्याने विनायक मराठवाडा लोकमंचाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी त्यांच्यावर टीका केली. विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे काम चव्हाण यांनी करावे, असा सल्ला त्यांनी दिला. विलासराव देशमुख यांनीही आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांना कोपरखळी लगावली.............

No comments: