Saturday, July 25, 2009

ब्रिटिशकालीन "वॉटर हायड्रण्ट' सध्या धूळ खात पडले

योगेश पवार : सकाळ वृत्तसेवा
मुंबई : शहरात आपत्कालीन स्थितीत अत्यंत उपयोगी ठरणारे ब्रिटिशकालीन "वॉटर हायड्रण्ट' सध्या धूळ खात पडले आहेत. बहुतांशी वॉटर हायड्रण्ट रस्ता रुंदीकरणामुळे जमिनीत गाडले गेले असून, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अग्निशमन दलाला घटनास्थळी पोचण्यासाठी बराच वेळ जातो. शहरातील काही भाग आता विकासामुळे व नव्या बांधकामांमुळे अरुंद आणि चिंचोळे झाले आहेत. झोपडपट्टी भागात आग लागल्यास तिथपर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे तत्काळ आग आटोक्‍यात आणणे सहज शक्‍य होत नाही. वांद्रे येथील बेहरामपाड्यात नुकत्याच लागलेल्या आगीनंतर प्रकर्षाने ही गोष्ट पुढे आली. आग विझविण्यासाठी पाणी तत्काळ उपलब्ध व्हावे यासाठी ब्रिटिशांनी जमिनीखालील जलवाहिनीला जोडलेले "वॉटर हायड्रण्ट (पाण्याचे खांब) शहरातील मोक्‍याच्या जागी, रस्त्यालगत जागोजागी उभारले होते. ब्रिटिशांनंतर महापालिकेने ही यंत्रणा स्वीकारली खरी; मात्र गेल्या काही वर्षांत त्यांची पूर्णतः वाताहत झाली आहे. काही वॉटर हायड्रण्ट मोडले आहेत. काही रस्त्याच्या आणि पदपथांच्या कामात जमिनीत गाडले गेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत यातून पाणी उपलब्ध होऊ शकत नाही; शिवाय अत्यंत हलगर्जीपणे ते जमिनीत गाडल्याने ते पदपथावर अडथळा बनले आहेत.सर्व्हे करण्याची मागणीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत आता आवाज उठविला असून, मनसेचे प्रभाग संघटक मिलिंद पांचाळ यांनी महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे "वॉटर हायड्रण्ट'चा सर्व्हे करावा आणि ते पुन्हा कार्यान्वित करावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख टी. डी. करगोप्पीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वॉटर हायड्रण्टचा सध्या वापर होत नसल्याचे सांगितले. शहरात मोठी आग लागल्यास ती विझविण्यासाठी वॉटर हायड्रण्टद्वारे पाणी घेतले जात असे. मोक्‍याच्या जागी असणाऱ्या वॉटर हायड्रण्टमुळे आग विझविण्यासाठी मोठी मदत होत असे. पूर्वी यामध्ये सातत्याने पाणी असायचे; मात्र कालांतराने अन्य पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी कबूल केले."वॉटर हायड्रण्ट' जुन्या जलवाहिनीला जोडण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करायचा झाल्यास जलवाहिनी कार्यरत करावी लागेल, असे करगोप्पीकर यांनी स्पष्ट केले. हे "वॉटर हायड्रण्ट'चे पुनरुज्जीवन होणार काय, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे...............................

No comments: