विलासरावांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 1 : कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणातील हिशेब पूर्ण करण्याचा भाग म्हणून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे बंधू दिलीप देशमुख यांचा आज अचानक राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यपाल एस. सी. जमीर यांनी आज त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. देशमुख यांच्या समावेशाने आता मंत्रिमंडळातील सर्व जागा पूर्ण झाल्या असून, कॉंग्रेसच्या विद्यमान मंत्र्यांपैकी कोणाचे तरी खाते कमी करून, ते देशमुख यांना द्यावे लागणार आहे.गेल्या महिन्यात (19 फेब्रुवारी) तीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्या वेळी दिलीप देशमुख, गोविंदराव आदिक, राजेंद्र दर्डा व उद्योगमंत्री नारायण राणे यांचे समर्थक कालिदास कोळंबकर यांच्यापैकी कोणाचा समावेश करायचा यावरून पेच निर्माण झाल्याने पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे एक जागा रिक्त ठेवूनच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. या राजकारणाला कंटाळून गोविंदराव आदिक यांनी कॉंग्रेसचा त्याग करून, आज नाशिक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. नेमका हाच मुहूर्त साधून दिलीप देशमुख यांची तडकाफडकी मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या मेळाव्याचा उल्लेख करीत आम्ही या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम घेतल्याची टिप्पणी केली. घाईघाईत झाला शपथविधीदेशमुख यांना त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याचा फोन दुपारी 4 वाजता आला. त्या वेळी ते लातूरला होते. सायंकाळी 6 वाजता शपथविधीची वेळ ठरविण्यात आली होती. मात्र, एवढ्या कमी वेळेत त्यांना मुंबईत येणे शक्य न झाल्याने शपथविधी अखेर सायंकाळी 7.30 वाजता झाला. देशमुख हे खास विमानाने मुंबईत दाखल झाल्याचे कळते. दिलीप देशमुख यांच्या समावेशाने विलासराव देशमुख यांचे मंत्रिमंडळातील वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, त्यांनी नारायण राणे यांच्यावर कुरघोडी करीत बाजी मारली आहे. लोकसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच रिक्त पद भरून असंतुष्टांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केल्याचे कळते.देशमुखांची अनुपस्थितीधाकट्या भावाच्या शपथविधीला विलासराव देशमुख यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री या वेळी उपस्थित नव्हता. दिलीप देशमुख यांच्या पत्नीसाठी राखून ठेवण्यात आलेले आसनही रिकामेच होते. तसेच लातूर येथील एका सामूहिक विवाह सोहळ्याला विलासराव गेल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे दिलीप देशमुख यांनी सांगितले.मराठवाड्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नव्हते यासाठी आपण दिलीप देशमुख यांचा समावेश केल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व देण्याचा आपण प्रयत्न केला, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. विलासराव देशमुख यांच्या वर्चस्वाबद्दल विचारले असता, त्यांनी विलासरावांचे वर्चस्व नेहमीच राहिल्याचे सांगितले.दिलीप देशमुख यांनी मात्र आपण कोणत्याही खात्यासाठी आग्रही नाही. मुख्यमंत्री देतील त्या खात्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. आपण सभागृहाचे सदस्य असून, लोकांनीही निवडून दिलेले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळणे यात काहीही गैर नाही आणि घराणेशाहीचाही प्रश्न नाही. आम्हा दोघांपैकी कोणी तरी राज्याच्या सेवेत राहावे, असा उद्देश असल्याची प्रतिक्रियाही देशमुख यांनी व्यक्त केली.
......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment