योगेश पवार/ सकाळ वृत्तसेवांमुंबई, ता. 17 : तळकोकणातील दोडामार्गात धुमाकूळ घालणाऱ्या कर्नाटकच्या हत्तींनी सरकारच्या नाकीनऊ आणले असताना उत्तरेकडील "हत्ती'च्या चालीने राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांना सध्या अस्वस्थ केले आहे. या लोकसभा निवडणुकीत मायावतींचे "मायाजाल' महाराष्ट्र काबीज करणार नसले, तरी त्यांची मोहिनी मात्र राहणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिलेली आणि अनेकांचा पराभव करण्यात प्रमुख भूमिका वठवणारा बहुजन समाज पक्ष या वेळी मुंबईतील सहा आणि ठाण्यातील चार जागांवर पुन्हा त्याच भूमिकेत वावरेल. त्यामुळे हत्तीच्या पावलांचा ठसा राज्याच्या भूमीवर उठून दिसणार, असा अंदाज व्यक्त होत आहे. धीम्या गतीची चाल चालणाऱ्या हत्तीने आता आपली चाल वेगवान केली आहे. उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशामुळे "बसप'च्या महत्त्वाकांक्षेने भरारी घेतली. "तिलक, तराजू और तलवार; इनको मारो जुते चार' अशी हाकाटी देणाऱ्या बसपने यू टर्न घेत, "हाती नही गणेश है..'चा नारा दिला आहे. सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला महाराष्ट्रात आजमावू पाहत आहे. आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये हा फॉर्म्युला त्यांनी वापरला आहे. सोशल इंजिनिअरिंगबरोबरच गेल्या काही निवडणुकांतील अनुभव गाठीशी घेऊन "बसप'चे या वेळी तगडे उमेदवार दिले आहेत. उद्योजक आणि बड्या माशांना गळाला लावले आहे. निवडणुकीत पैशासह बलशक्तीचा वापर होतो. याला चोख उत्तर देता यावे, यासाठी "लोहा लोहे को काटता है' या न्यायाने उमेदवारांची निवड केली आहे. मुंबईतून मोहम्मद अली, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार अरुण गवळी, ठाण्यातून उद्योजक त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे; तर मुंबई - ठाण्यात अन्य जागांवरही धनशक्ती आणि बलशक्ती असणाऱ्यांना उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.2004 मध्ये दक्षिण मध्य मुंबईतून "बसप'च्या अब्दुल चौधरी यांना 1.35 टक्के मते मिळाली होते. येथून लढलेल्या अरुण गवळींना 26.50 टक्के मते मिळाली होती. या वेळी गवळी "बसप'च्या तंबूत डेरेदाखल झालेत. ते येथील संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात "बसप' वरचढ ठरणार आहे. दक्षिण मुंबईत 0.62 टक्के, उत्तर पूर्वमध्ये 1.01, उत्तर पश्चिम मध्ये 0.92, उत्तर मुंबईत 0.83; तर ठाण्यात 1.89 टक्के मते मिळविली होती. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ही मते होती. या वेळी या टक्केवारीत सुधारणा होईल; पण विजयी मते मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. बसपने 1984 पासून निवडणुका लढायला सुरुवात केली. तेव्हा भूमिका वेगळी होती. या वेळी पडण्यासाठी वा पाडण्यासाठी लढायचे नाही, असा निर्धार त्यांनी केला असला, तरी महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई - ठाण्यात बसपच्या सीट जिंकण्याएवढे वातावरण नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बसपचा भर उत्तर भारतीय आणि दलित मुस्लिमांवर आहे. लोकसभेच्या निवडणुका घोषित होण्यापूर्वीच पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. संभाव्य उमेदवारांना कामाला लावले. ठाणे, मुंबईसह विदर्भ, कोकण, मराठवाडा या भागांत संमेलने घेतली. मुंबईत "भाईचारा' संमेलनावर भर दिला आहे. सत्तेची मोठा मोठी आश्वासने न देता सामान्य व्यक्तीच्या प्रश्नाला हात घालत सर्वांना समान वागणूक देण्याचा वादा ते करीत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या गटातटाला आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या पाठीमागे सुरू असलेल्या लांगूलचालनाला कंटाळलेली आंबेडकरी जनता, मनसेच्या आंदोलनामुळे बुजलेले उत्तर भारतीय, झोपडीवासीय या वेळी एक संधी यांनाही देऊन बघू, असा विचार करण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन नेते बसपचा आपल्याला काहीच धोका नसल्याचे छातीठोकपणे सांगत असले, तरी त्यांनीही बसपच्या वाढत्या ताकदीचा अंदाज घ्यायला सुरवात केली आहे. बसपच्या नेत्यांनी आपल्या मुंबईसह राज्यातील काही जागांवर विजय अपेक्षित असल्याचा दावा केला असला, तरी घोडामैदान जवळच आहे.
......
No comments:
Post a Comment