Thursday, September 25, 2008

माध्यमिक शाळांतही आता सर्वशिक्षा अभियानकेंद्राचा निर्णय

ता. 29 : केंद्र सरकारमार्फत प्राथमिक शिक्षणासाठी लागू करण्यात आलेले "सर्वशिक्षा अभियान' आता इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतच्या शिक्षणासाठीही लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला असून याबाबत प्राथमिक स्तरावर देशभरातील सर्व माध्यमिक शाळांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्राथमिक शिक्षणासाठी लागू करण्यात आलेल्या सर्वशिक्षा अभियानामुळे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणास चालना मिळाली. या अभियानामुळे एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 85 टक्के सुधारणा झाली. आठवीतून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्याला तेवढ्याच दर्जाचे शिक्षण मिळावे, पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि अकराव्या पंचवार्षिक योजनेत शिक्षणासाठी मंजूर करण्यात आलेला 76 हजार कोटी रुपयांच्या निधीचा योग्य विनियोग व्हावा, या उद्देशाने सरकारने माध्यमिक स्तरावरही सर्वशिक्षा अभियान राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण या माध्यमातून होणार आहे. देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळांना ही योजना लागू केली जाणार आहे. त्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत. माध्यमिक शाळांमधील भौतिक, शैक्षणिक माहिती, शाळांचा निकाल याबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे. यामध्ये सीबीएसई, आयसीएसई या शाळांचाही समावेश असणार आहे.मनुष्यबळ विकास मंत्रालयाने माहिती संकलित करण्याची जबाबदारी "राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विश्‍वविद्यालयावर' सोपवली आहे. "सेकंडरी एज्युकेशन मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम' या सॉप्टवेअरच्या माध्यमातून ही माहिती ऑनलाईन संकलित केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे माध्यमिक शिक्षणासाठी नेमकी कशाची गरज आहे. उणिवा काय आणि प्रबळ घटक कोणते, यांचा अभ्यास केला जाणार असून त्यानुसार योजना आयोगाने मंजूर केलेल्या निधीचा पुरवठा केला जाणार असल्याचे कळते. सध्या ही योजना प्राथमिक अवस्थेत आहे. राज्या-राज्यातील शिक्षण संचालकांमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या योजनेबाबत चाचपणी केली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

No comments: