Tuesday, September 23, 2008

राजा'ची कृपा"दिग्विजय'ला मिळाली झळाळी!

राजा'ची कृपा"दिग्विजय'ला मिळाली झळाळी!

योगेश पवार ः

मुंबई : ओसाड निर्मनुष्य वातावरण, फुटलेली तावदाने, क्षरपंजरी पडलेली चिमणी, जागोजागी लटकणारी जळमटे, भिंतीच्या उडालेल्या खपल्या व वटवाघळांचा मुक्त संचार अशा भग्नावस्थेत 20-22 वर्षे दुर्लक्षित पडलेली लालबागची दिग्विजय टेक्‍स्टाईल मिल गेल्या काही दिवसांपासून गणेशभक्तांनी अक्षरश: गजबजून गेली आहे. मिलच्या आवारात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने तिला पुन्हा एकदा नवी झळाळी प्राप्त झाली आहे. "लालबागच्या राजा'चीच ही किमया म्हणावी लागेल.अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त "लालबागच्या राजा'च्या दर्शानासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. सुमारे एक कोटी भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज आहे. भक्‍तांचा हा महापूर आवर घालण्यापलीकडे असल्याची जाणीव झाल्याने त्यांच्या सोयीसाठी यंदा "लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ने शेजारच्या दिग्विजय टेक्‍स्टाईल मिलची अर्धी जागा 10 दिवसांसाठी भाड्याने घेतली आहे. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने ही जागा गणेश मंडळाला भक्तांच्या सोयी-सुविधेसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी या कामी पुढाकार घेतला. शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी ही जागा तात्पुरत्या स्वरूपात मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचे मंडळाचे कार्यकर्ते बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.एकेकाळी शेकडोंच्या संख्येने गिरणी कामगार "दिग्विजय मिल'मधून बाहेर पडत असत; नंतर मात्र चिटपाखरूही या जागी फिरकेनासे झाले. त्यामुळे सतत गजबजाट असलेली ही मिल एकदम ओकीबोकी झाली. या वर्षी मात्र "लालबागच्या राजा'मुळे तिचे भाग्य उजाळले आहे. "राजा'च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मिलची अर्धी जागा घेण्यात आल्याने, काही काळ का होईना "दिग्विजय'चे आवार पुन्हा एकदा माणसांनी फुलून गेले आहे. "राजा'च्या मुखदर्शनाची रांग मिलच्या आवारातून काढण्यात आली असून, मिलच्या जागेची खास सजावट करण्यात आली आहे. मिलच्या आवारात विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण परिसर झगमगून गेला असून, मिलला एक नवे रूप आले आहे. सर्वत्र कार्पेट पसरण्यात आले असून, पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. जागोजागी रेलिंग बांधण्यात आल्या आहेत. एक्‍झॉस्ट फॅन आणि सीसी टीव्हीही लावण्यात आले आहेत. एकाच वेळी सहा ते सात हजार गणेशभक्त या मार्गातून "राजा'च्या दर्शनासाठी पुढे सरकत आहेत. भक्तांच्या रांगेतून "राजा'च्या दर्शनासाठी आलेला आणि पुढे पुढे सरकणारा एखादा मिल कामगार "पुन्हा सोन्याचे दिवस येऊ दे रे गणराया' असे साकडे "राजा'स नक्कीच घालत असेल.चौकट80 च्या दशकापासून दुर्दशा1980 पासून मुंबईतील गिरण्यांना घरघर लागली आणि कालांतराने गिरण्या बंद पडल्या. गिरणी कामगार देशोधडीला लागले. वस्त्रोद्योग मंत्रालयाने एकूण 24 गिरण्यांपैकी 15 गिरण्या बंद करण्याचा निर्णय घेतला; त्यात "दिग्विजय'चा समावेश होता. कामगारांची देणी देण्यात आल्यानंतर 2004 मध्ये ही मिल बंद करण्यात आली; परंतु तिच्या दुर्दशेला खरी सुरुवात 80 च्या दशकापासूनच झाली, अशी माहिती गिरणी कामगारनेते दत्ता इस्वलकर यांनी दिली.

No comments: