Thursday, September 25, 2008

पर्सेंटाईल रद्द झाल्याने सरकारवर नामुष्कीन्यायालयाची

मुंबई, ता. 26 : राज्याच्या शिक्षण विभागाने या वर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी लागू केलेल्या 70:30 च्या वादग्रस्त कोट्यामुळे उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले असतानाच आज पर्सेंटाईलचा निर्णय रद्द करून न्यायालयाने सरकारला चपराक लगावली आहे. न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे राज्य सरकारवर नामुष्की ओढवली असून शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके आणि शिक्षण सचिवच याला जबाबदार आहेत, अशी चर्चा आहे. विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेचा विषय होणारी अकरावीची प्रवेशप्रक्रिया यंदा गाजली ती शिक्षण विभागाच्या वादग्रस्त निर्णयांमुळे. अकरावी प्रवेशाचा गुंता सोडवायला गेलेल्या राज्याच्या शिक्षण विभागाने तो अधिक जटील केला. प्रवेशात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देणारा 70:30 या जिल्हा कोट्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊन सरकारने ऐन प्रवेशाच्या वेळी महाविद्यालयाचे प्रशासन, पालक आणि विद्यार्थी यांची धावपळ आणि गोंधळ उडवून दिला होता. न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले गेले. न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणावर अखेर पडदा पडला. या वेळी निर्णय देताना न्यायालयाने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. आज पर्सेंटाईलचा निर्णय रद्द करताना उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिक्षण खात्याच्या अशा वादग्रस्त कारभारामुळे सरकारला न्यायालयाकडून वारंवार कानपिचक्‍या मिळत आहेत. शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या कारभाराबद्दल मुख्यमंत्री विलासराव देशमुख नाराज असल्याचे बोलले जाते. पुरकेंच्या निर्णयानंतर उठलेले वादळ शमविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे मंत्रिमंडळातून वगळण्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या यादीतही पुरके यांचे नाव असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला शालेय शिक्षण सचिव संजयकुमार यांच्या गाठीशीही या खात्यातील फारसा अनुभव नाही. त्यामुळे आजवर झालेले निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सरकारकडून समस्यांचे निराकरण व्हावे, अशी सामान्य जनतेची अपेक्षा असते. इथे मात्र सरकारनेच गोंधळ घातल्याने सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान, याबाबत शालेय शिक्षण सचिव संजयकुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "आपण न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे हाती आल्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही.' तर शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

No comments: