
ंमुंबईत आलेल्या परप्रांतीयांची मिळेल ते काम करून आपले बस्तान येथे बसवले आहे. शहरातील लहान मोठे व्यवसाय करून त्यावर ताबा मिळवला आणि आम्ही मात्र मुंबईकर असल्याचा फुकाचा अभिमान बाळगत बसलो.परप्रांतीयांचे आक्रमण हे केवळ मुंबई पुरते मर्यादित राहिलेले नाही. राज्याच्या काना कोपऱ्यात अगदी तालुका, गाव पातळीवरही भाय्यांनी हात पाय पसरले आहेत. परवाच कोकणात गावाकडे गेलो होतो. पहाटे पावणे सहाच्या सुमारास एस.टी. बस स्थानकावर उतरलो. भल्या पहाटे कोकणी माणूस झोपेतून उठलाही नव्हता तेव्हा मला एस.टी.स्थानकावर भय्यांचा वावर दिसला. डोक्यावर टोस्ट, बटराच्या पाट्या घेऊन 20 ते 25 भय्ये स्थानकावर जमले होते. सकाळी सहा वाजता एस.स.टी. स्थानकातून गाड्या तालुक्यातील गावा गावात रवाना होतात. या गाड्यांमधून हे भय्ये दुर्गम भागात जाऊन तेथे बटर,टोस्ट विकतात. गावात एस.टी. जात असली तरी ती काही अंतरापर्यंतच. तेथून पुढे वाडी वस्तीत जाऊन वजनदार पाटी डोक्यावर घेऊन बटर विकावे लागतात. तालुक्याच्या ठिकाणची कापडाची दुकाने, गुजराथींची, बेकरी दक्षिण भारतीयांची, इलेक्टनिक्सची दुकाने सिंधी लोकांची आणि बाजारात येणारी भाजी कोल्हापूर, बेळगावची. भाजी विक्रेतेही तिथलेच. स्थानिक मराठी माणूस केवळ महिन्याला मिळणाऱ्या जागेच्या भाड्याचा धनी. किंवा एखादी टाटा सुमो गाडी घेऊन बेकायदा प्रवासी वाहतूक करायची हा शंभरात दोघा तिघांचा उद्योग. बाकीचे सारे मान्सूनच्य बेभरवशी पावसा सारखीच बेभरवशी शेती पारंपरिक पद्धतीने करणारे. दोन ते तीन महिने काम करून झाले की उर्वरित काळ असाच फुकट दवडायचा. मग सांगा भय्यांनी वा अन्य लोकांनी मेहनत करून पैसे कमावले तर आपण आदळा आपट करून काय कामाची. 'यूपी'हून घरदार सोडून आलेल्या भय्यांना कोकणात रोजगार सापडतो. येथे राहून ते युपीतील आपली कुटुंब पोसू शकतात तर मग स्थानिक माणसाला हा उद्योग का जामत नाही. केवळ जमिनीचे, जागेचे , इमारतीचे भाडे घेऊन किती काळ जगणार. हा प्रश्न स्वतः:चाच स्वतः:ला विचारायला हवा.आज बचत गटाच्या माध्यमातून एक चळवळ कोकणातही उभी राहतेय. बचत गटांनी व तरुणांनी विचार करून येथेच रोजगार निमिर्तीचा निर्धार केला तर नक्कीच लहान मोठे उद्योग उभे राहू शकतात. गरज आहे इच्छा शक्तीचे सध्या दक्षिण भारतातील काही लोकांनी कोकणातील, नदी काठच्या , वहाळा काठच्या पडीक जमिनी मोठ्या प्रमाणावर लिजवर घेण्याचा सपाटा लावला आहे. आमचा स्थानिक माणूस एकदम मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासापायी, तर कधी मजबूरीने जमिनी विकतो किंवा करारावर देत आहे. कोकणी माणसाने पडीक ठरवलेल्या जमिनीवर दक्षिण भारतीय माणूस पाले भाजी, फळे यांचे उत्पादन काढतो आणि पैसे कमावतोय. आणि जमिनीचे मूळ मालक आपल्याच जमिनीत दुसऱ्याकडे 80 -90 रुपये रोजात राबवतात असे विदारक चित्र सर्वत्र कोकणात दिसते.महिलांना तर त्याही पेक्षा कमी रोज दिला जातो. एकंदरीतच आमच्या भूमीची किंमत आम्हाला कळलीच नाही. कळली तरी त्यात दीर्घकाळ मेहनत करून सोनं टिकवण्याची मानसिकता नाही. ही पारंपरिक मानसिकता बदलायला हवी. दहावी, बारावी झालं की सरळ मुंबईचा रस्ता धरायचा आणि तेथे दोन तीन हजारात "हापीसात" काम कारचे. बस्स झाले आता. मी उभ्या केलेल्या एखाद्या कंपनीत मी दहा बारा मुले कामाला ठेवीन 100 ते 500 जणांना रोजगार उपलब्ध करून देईन अशी मानसिकता बळावायाला हवी. संकूचीतपणा सोडला पाहिजे. तरच स्वतः:सोबत कोकणाचे कल्याण होऊ शकते. सहकार कधी कोकणात रुजलाच नाही. जमिनींच्या तुकडी कारणामुळे आणि एकंदरीत भौगोलिक स्थितीमुळे शेतीत प्रगती करता आली नाही. कोकणची भूमी पेराल ते उगवण्याची क्षमता असणारी आहे. पाण त्या भूमीचा कधी वापर करता आला नाही. येथील प्रत्येकाच्या गोठ्यात भाकड जनावरांचा भरणाच अधिक, दूध दुभती अर्धा एक लिटर पर्यंतचं. पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक असताना गोठ्यात भरलेला भाताचा पेढा जनावरांना खायला घालायचा अन उन्हाळ्यात चाऱ्याची वानवा निर्माण झालेली असताना जनावरे प्लास्टिकच्या पिशव्या, कागद खात हिंडतात. पशुधनाची योग्य काळजी नाही. साऱ्याच गोष्टीत नियोजनाचा अभाव. गावकी अन् गावकीच्या बॅंकांचा मात्र सुकाळ. वाडीत 15 -20 घरे असतील तर त्यातली 8 बंद, आठ चालू आणि चार विरोधात, एका वाडीत दोन भावक्या आणि मंडळे कार्यरत असतात काहीवेळा. कोकणातील हे पारंपरिक चित्र आता काहीसं बदलत असलं तरी जगाच्या तुलनेत त्याचा वेग नगन्यच. निसर्ग सौंदर्याची कोकणावर मुक्त हस्ते उधळण झाली आहे. मोठा सागरी किनारा लाभला आहे. बीचेस आहेत. मात्र त्याचा पर्यटनासाठी आजवर वापर करता आला नाही. हे चित्र बदलायला हवे पर्यटनाच्या विकासाने कोकणात विकासाची गंगा येईल. कोकणात रेल्वे आली पण त्यात रोजगार मिळालेले किती कोकणी आहेत. ज्यांच्या जमिनी रेल्वेत गेल्या त्यांनी त्याचा मोबदला पैशाच्या रूपात घेतला. हा पैसा खाऊन ते मोकळेही झाले. प्रकल्पग्रस्त म्हणून रेल्वेत टी.सी. वैगेरेची नोकरी मिळवली. पण किती जणांनी रेल्वे स्थानकावर स्टॉल मिळावा अशी मागणी केली. याचे उत्तर बहुतांशी नाहीच येईल. रेल्वे स्थानकावरील स्टॉल दक्षिण किंवा उत्तर भारतीयांचे आहेत. रेल्वेस्थानकावर काकडी विकणाऱ्या महिला मला दिसल्या त्यांची सहज चौकशी केली तेव्हा कळले त्या राहणार सांगलीतल्या. बेळगावमध्ये काकडी विकत घेऊन त्या कोकण रेल्वेत विकतात. रत्नागिरीतच कुठे तरी राहून ते हा व्यवसाय करतात. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. हाच व्यवसाय कोकणी माणसाने का करू नये. पावसाळ्याच्या दिवसात तरी कोकणातील गावा गावात काकडी, अन्य भाज्यांचे उत्पन्न निघू शकते. हाच शेत माल जर कोकण रेल्वेत विकला तर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.कोकणच्या मागासलेपणाला येथील मानसिकता कारणीभूत आहेच पाण त्याच बरोबर येथील अपयशी राजकारणी आणि सत्तेवर आजवर आलेली सरकारे कारणीभूत आहेत.बुडत्या बॅंकेवरचा चेक द्यावा तशी कोकण विकासाची पॅकेज जाहीर केली जातात.त्याचा सर्वसामान्य कोकणी माणसाला फायदा किती होतो हे ही एक गौडबंगाल आहे. दुसऱ्याच्या मदतीवर कोणी जागत नाही आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे हेच खरे याची जाणीव प्रत्येकाला झाली.
..................
योगेश पवार
..................
योगेश पवार
No comments:
Post a Comment