Monday, August 3, 2009

अण्णा आणि आबांमधील दुरावा संपला





मुंबई, ता. 27 : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात निर्माण झालेला दुरावा अखेर दूर झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी साथ न दिल्यामुळे आपण गृहमंत्री असताना पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपींचा तपास लागला नाही, अशी खंत पाटील यांनी आपली भेट घेऊन व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्याबाबत माझ्या मनात कसलीही नाराजी नाही, असे अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांना सांगितले. पवनराजे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी तीन वर्षे लागली. या काळात आर. आर. पाटील गृहमंत्री असतानाही या प्रकरणातील आरोपी सापडू शकले नाहीत. ते पायउतार झाल्यानंतर या प्रकरणात राष्ट्रवादीतून काढून टाकण्यात आलेल्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे नाव आले. तसेच अण्णा हजारेंच्या हत्येच्या सुपारीचा कटही उघड झाला. यावरून आर. आर. पाटील व अण्णा हजारे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. याबाबत अण्णांना आज पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, "आपल्यात व आर. आर. पाटील यांच्यात कसलाही दुरावा नाही', असे स्पष्ट केले. येत्या विधानसभा निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत; मग उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्या प्रचारात सहभागी होऊ, असे हजारे यांनी सांगितले. खासदार राजू शेट्टी, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांच्या पक्षासाठी व आर. आर. पाटील यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

(sakal)

-------------------

No comments: