Friday, August 28, 2009

गोष्ट छोटी डोंगराएवढी' पाहून राष्ट्रपतीही हेलावल्या

मुंबई, ता. 26 : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या ज्वलंत विषयावर आधारित "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या मराठी चित्रपटाचा खास शो राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासाठी मंगळवारी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आला होता. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळी कुटुंबीयांसह हा चित्रपट पाहिला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे व त्यांच्या कुटुंबीयांचे चित्रपटात उभे करण्यात आलेले दाहक चित्र पाहून क्षणभर राष्ट्रपतीही हेलावल्या.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी देवीसिंह शेखावत उपस्थित होते. ठाकरे कुटुंबीयांनी राष्ट्रपतींशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच राष्ट्रपती भवनाची पाहणी करून स्नेहभोजन केले. सायंकाळी राष्ट्रपतींसाठी "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपतींसह, उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस, उद्धव यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर आणि चित्रपटातील कलावंत मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले यावेळी उपस्थित होते.

"गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटातील शेतकऱ्यांची कथा पाहून राष्ट्रपती आणि उद्धव ठाकरेही क्षणभर हेलावले. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्‍नावर अधिक लक्ष देण्याची गरज राष्ट्रपतींनी चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त केली, असे चित्रपटातील कलावंतांनी सांगितले.
........

जाणार मंडलिक कुणीकडे?

मुंबई, ता.26 : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची सोबत करणारे कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक विधानसभा निवडणुकीत कुणीकडे जाणार, यावरून रिपब्लिकन आणि डाव्या आघाडीत संभ्रम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीसोबत काडीमोड घेत शिवसेना-भाजप युतीशी घरोब्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, तर तिसऱ्या आघाडीचे नेते मंडलिक "आपलेच' असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे मंडलिक नक्की कुणीकडचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
डाव्या लोकशाही आघाडीने लोकसभा निवडणुकीत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता. तिसऱ्या आघाडीच्या पाठिंब्यावर दोन्ही खासदार निवडून आले. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचे नेते आपल्या संख्याबळात मंडलिकांना नेहमीच मोजत आले आहेत. मंडलिक स्वतः डाव्या आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत, तरी राजू शेट्टी यांनी त्यांना तिसऱ्या आघाडीत आपल्यासोबत ठेवण्याची हमी घेतली होती. त्यांना तिसऱ्या आघाडीत आणण्यातही राजू शेट्टी यांची महत्त्वाची भूमिका होती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंडलिक आणि शेट्टी यांचे फारसे चांगले संबंध उरलेले नाहीत; मात्र मंडलिक तिसऱ्या आघाडीतच असल्याचे सांगून खासदार राजू शेट्टी आपली बाजू सावरून घेत आहेत. आपल्या वाट्याला येणाऱ्या विधानसभेच्या जागा मंडलिक यांना देण्याची तयारी शेट्टी यांनी आघाडीच्या बैठकीत दाखविली आहे;
मात्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह युतीसोबत जाण्याच्या विचार सुरू केला आहे. त्यामुळे तिसरी आघाडी संभ्रमात सापडली आहे. मंडलिक यांच्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर राजू शेट्टी आणि तिसऱ्या आघाडीचे नेते काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
.......

रिपब्लिकन डावी लोकशाही समिती स्थापन

रिपब्लिकन ऐक्‍यासह 20 पक्षांची मोट; 288 जागा लढविणार


मुंबई, ता. 24 : आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना - भाजपला टक्कर देण्यासाठी डावे पक्ष आणि रिपब्लिकन ऐक्‍यात सामील सर्व गटांसह सुमारे 20 पक्षांची मोट बांधून "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती' नावाची जंबो आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीत आज आमदार कपिल पाटील, अबू आझमी सहभागी झाले. विधानसभेच्या 288 जागा लढविण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी बैठकीत घेतला. मात्र जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

दुष्काळ, महागाई, भारनियमन, दलित अत्याचार, सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी हे निवडणुकीतील प्रचाराचे प्रमुख मुद्दे राहतील, असे आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले. जागावाटपाबाबत मात्र आजच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीत "रिपब्लिकन ऐक्‍य' कायमस्वरूपी राहील, अशी ग्वाही माजी खासदार रामदास आठवले यांनी दिली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आपल्याशी संपर्क साधत असले, तरी आपण मात्र त्यांच्या संपर्कात नाही. आपण कोणत्याही स्थितीत कॉंग्रेससोबत जाणार नाही. निवडणुकीत "रिपब्लिकन'ची ताकद कॉंग्रेसला दाखवून देऊ, असे आठवले यांनी सांगितले. सत्ताधारी भ्रष्टाचारी झाले आहेत, विरोधी पक्षाचा त्यांच्यावर अंकुश नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला तिसरी आघाडी हा सक्षम पर्याय असेल, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले; तर अबू आझमी यांनी ही समिती राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

रिपब्लिकनचा पगडा
तिसऱ्या आघाडीवर रिपब्लिकन पक्षाचा पगडा आहे. आघाडीच्या नावात रिपब्लिकनचा समावेश करण्याचा आग्रह नेत्यांनी धरला. त्यामुळे आघाडीचे नाव बदलण्यात आले. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाने जास्तीत जास्त जागांचा आग्रह धरला आहे. तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री हा रिपब्लिकनचा असेल, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले. रामदास आठवले आणि डॉ. गवई दोघांनीही मुख्यमंत्रिपदाची इच्छाही प्रदर्शित केली.

...तरच आंबेडकरांना घेऊ
ऍड्‌. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्‍यात सामील झाल्याशिवाय त्यांना स्वतंत्र पक्ष म्हणून तिसऱ्या आघाडीत प्रवेश दिला जाणार नाही, असे नेत्यांनी स्पष्ट केले. डाव्या नेत्यांनी त्यांना आघाडीत घेतल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, अशी धमकी आठवले यांनी दिल्याने नेत्यांनी ही भूमिका घेतल्याचे कळते. दरम्यान, राज्यातील आघाडी सरकारमधील राज्यमंत्री प्रीतमकुमार शेगावकर यांच्या राजीनाम्याबाबत मात्र आठवले यांनी टोलवाटोलवीलीची उत्तरे दिली.
आघाडीत आमदार हितेंद्र ठाकूर यांना घेण्याची डाव्या नेत्यांची इच्छा होती; मात्र आमदार कपिल पाटील, डॉ. कुमार सप्तर्षी व राजू शेट्टी यांनी ठाकूर यांच्या समावेशास विरोध केला.

(चौकट)
संयुक्त मेळावा सप्टेंबरमध्ये
येत्या 12 सप्टेंबर रोजी तिसऱ्या आघाडीच्या सर्व घटक पक्षांचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या वेळी शक्तिप्रदर्शन करण्यात येईल.

(चौकट)
आघाडीतील घटक पक्ष
शेकाप, माकप, भाकप, रिपब्लिकन ऐक्‍य, जनता दल सेक्‍युलर, समाजवादी जनपरिषद, समाजवादी पक्ष, सोशालिस्ट फ्रंट, लोकभारती, राष्ट्रीय समाज पक्ष, लोक संघर्ष मोर्चा, लोक राजनीती मंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष.

डावे आणि आरपीआयमध्ये जागांसाठी रस्सीखेच

मुंबई, ता. 25 : विधिमंडळात संख्येने नगण्य असलेले परंतु राजकीय व सामाजिक स्तरावर आगामी विधानसभा निवडणुकीत प्रभावी ठरू शकणारे डावे आणि रिपब्लिकन पक्ष यांच्यासह 20 पक्षांच्या सहभागातून स्थापन झालेल्या "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती'चा जागावाटपात खरा कस लागणार असून विविध पक्ष आणि गटातटांचे समाधान करण्याचे आव्हान समितीसमोर असेल. रिपब्लिकन पक्ष आणि डाव्या आघाडीत जागांसाठी रस्सीखेच होऊ शकते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड), डावी लोकशाही आघाडी आणि परिवर्तन समिती यांच्यात सामील असणाऱ्या गटातटांचे आणि लहान लहान पक्षांची एकत्रित मोट बांधून एक जंबो आघाडी स्थापन करण्यात आली आहे. कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीला या समितीचा प्रामुख्याने विरोध राहणार आहे. येत्या 28 ते 30 ऑगस्ट या कालावधीत जागावाटपाबाबत चर्चा होणार असून समितीतील घटक पक्षांची संख्या पाहता या पक्षांचे, गटा-तटाचे समाधान करण्यासाठी नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

रिपब्लिकन पक्षाला झुकते माप
प्रत्येक पक्ष आपल्या प्रभाव क्षेत्रात लढणार असल्याने जागावाटपावरून वाद होण्याची शक्‍यता नाही असा, दावा नेत्यांनी केला आहे. या समितीतील रिपब्लिकन ऐक्‍य हा सर्वाधिक मोठा गट असल्याने जागावाटपात त्या पक्षाला झुकते माप देण्याबरोबर नेतृत्वातही संधी दिली जाणार आहे. विशेषत: जागावाटपात खरी रस्सीखेच डावी आघाडी आणि रिपब्लिकन पक्षात आहे; मात्र डाव्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाला त्याच्या ताकदीनुसार जागा देण्याचा विचार चालवला आहे. विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघापैकी
रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे अस्तित्व 201 मतदारसंघात आहे; तर 63 मतदारसंघात त्यांचा विशेष प्रभाव आहे. रामदास आठवले गटाचा 24 मतदारसंघात प्रभाव आहे; तर प्रकाश आंबेडकर यांचा 17 मतदारसंघात प्रभाव आहे. मात्र आंबेडकर यांचा पक्ष समितीत सामिल झालेला नाही; तर समाजवादी पक्षाचा ठाणे, औरंगाबाद, या ठिकाणी प्रभाव असल्याने त्यांची जागांची मागणी मर्यादित राहणार आहे. परिवर्तन मंच विशेषत: मुंबई आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील जागांवर दावा करण्याची शक्‍यता असून डाव्या आघाडीला रायगड, विदर्भ, मराठवाडा आदी ठिकाणी जास्त जागा हव्या आहेत. या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव असल्याने या भागातील जागांवर रस्सीखेच होऊ शकते. प्रस्थापित राजकीय पक्षांना विरोध करण्यासाठी काही पक्ष आणि संघटना आघाडीत सामील झाल्या असून त्यांच्याकडून एखाद-दुसऱ्या जागेची मागणी होण्याची शक्‍यता आहे.

प्रमुख आघाड्यांना जागा
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीत सामील झालेल्या प्रमुख आघाड्यांना त्यांच्या प्रभाव क्षेत्रानुसार जागावाटप होणार असून या आघाड्यांनी आपल्या लहान, मोठ्या सहकारी पक्षांना त्या जागा विभागून द्याव्यात, असे धोरण राबविले जाणार आहे. प्रमुख आघाड्यांनी आपले वाद आपापल्या पातळीवर सोडवावेत, यासाठी हे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
.........

Tuesday, August 25, 2009

मंदीतही 80 हजार लोकांना मिळाल्या नोकऱ्या

मुंबई, ता. 21 : जागतिक मंदीचा फटका बसल्याने गेल्या वर्षभरात खासगी क्षेत्रातील हजारो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत; मात्र राज्यातील सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांतील रिक्त जागांवर झालेल्या नोकरभरतीमुळे गेल्या दहा महिन्यांत 80 हजार 415 जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, तर ऑक्‍टोबर महिन्यात आणखी तीन हजार जणांना नोकऱ्या मिळणार आहेत. खासगी बॅंकांतही हजारो पदे भरली जाणार आहेत. आर्थिक वर्षाच्या सहामाहीपूर्वीच आर्थिक मंदीचे सावट दूर होत असल्याने आश्‍वासक वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक स्तरावर आलेल्या वित्तीय संकटामुळे भारतातही अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला होता. मंदीच्या तडाख्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. विशेषतः खासगी सेवाक्षेत्राला मंदीचा तडाखा बसला. मंदी सुमारे दोन वर्षे टिकेल असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज होता.
राज्यात मात्र मंदीतही सप्टेंबर 2008 ते जून 2009 अखेरपर्यंत प्रथम, द्वितीय आणि तृतीय व चतुर्थ श्रेणीतील हजारो रिक्त पदे जाहिरातींच्या माध्यमातून भरण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेतील विविध वर्गांतील 36 हजार 334 पदांचा समावेश आहे. मंदी असली तरी सरकारने मात्र रिक्त पदांवरील नोकरभरती सुरू ठेवली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आणि न्यायालयीन खटले निकाली निघाल्यानंतर अनेक जागा भरण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

चालू महिन्यातही शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील सुमारे तीन हजार रिक्त जागांवर नोकरभरती होत असून याबाबतच्या जाहिराती गेल्या दोन महिन्यांत वाढल्या आहेत. म्हाडा, मुंबई पोलिस आयुक्तालय, एस. टी. महामंडळ, समाजकल्याण संचालनालय, अन्ननागरी पुरवठा विभाग, सहकार आणि पणन व वस्त्रोद्योग विभाग, मुंबई महानगरपालिका, राज्य शिक्षण संचालनालय, अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटल, नाशिक आदिवासी विभाग, भारतीय खाद्य महामंडळ आणि शासनाच्या कृषी विभागातील विविध पदांची मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे.

मंदीच्या छायेखाली असलेल्या बॅंका आणि वित्तीय संस्थांतही नोकरभरती सुरू झाली असून स्टेट बॅंकेत 11 हजार पदे भरली जाणार आहेत. बॅंक ऑफ इंडिया आणि एस. बी. आय. बॅंकेतही भरती होणार आहे. मंदीचे सावट दूर होत असल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.
...........

Tuesday, August 18, 2009

स्वाइन फ्लूचा राजकीय पक्षांनाही दणका


मुंबई, ता. 14 : पुण्या- मुंबईसह राज्यातील काही भागात थैमान घालणाऱ्या स्वाइन फ्लूचा राजकीय पक्षांनाही दणका बसला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव होण्याच्या धास्तीने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपला राज्यव्यापी दौरा रद्द केला आहे, तर भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, बहुजन समाज पक्षाने जाहीर मेळावे, सभा, संमेलने यांना फाटा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वाइन फ्लूची आपत्ती निर्माण झाल्याने निवडणूकपूर्व प्रचारात मरगळ आली आहे.स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या वाढत असल्याने साऱ्यांचीच पाचावर धारण बसली आहे. या रोगाची साथ रोखण्यासाठी सध्या सर्वच पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना दहीहंड्या रद्द कराव्या लागल्या. या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा आणि आपला प्रचार दणक्‍यात करण्याची नामी संधी अनेक राजकीय नेत्यांना आणि विधानसभा निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांना गमवावी लागली. गणेशोत्सवावरही या साथीचे सावट राहण्याची शक्‍यता असल्याने सारेच धास्तावले आहेत.विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या तालुका पातळीपर्यंत सभा, बैठका सुरू झाल्या आहेत. प्रमुख नेतेही राज्याच्या दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत आहेत; मात्र पुण्या-मुंबईतून येणारे कार्यकर्ते व नेत्यांच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत साथीचे लोण पसरण्याची शक्‍यता असल्याने राजकीय पक्षांनी जाहीर मेळावे, सभा घेण्याचे टाळून कार्यकर्त्यांच्या बैठका आणि घरोघरी संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपला 16 ऑगस्टपासून सुरू होणारा दौरा रद्द केला आहे. मुंबईतले अनेक कार्यक्रमही रद्द केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही कार्यकर्त्यांना सभा, संमेलने, मेळावे न घेण्याचे आवाहन केले आहे, असे प्रवक्ते मदन बाफना यांनी सांगितले. भाजपनेही जाहीर मेळावे, सभांना फाटा दिला आहे. गर्दीच्या माध्यमातून स्वाइन फ्लूचा फैलाव होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाइन फ्लूबाबत जनजागृतीची मोहीम पक्षाच्या "डॉक्‍टर्स सेल'मार्फत हाती घेण्यात आल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. बहुजन समाज पक्षानेही पुणे, मुंबई आणि राज्याच्या अन्य भागांतील आपले मेळावे रद्द केले असल्याचे बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितले.-

---------------------

Thursday, August 13, 2009

कोकणाने आता बदलायला हवे !


ंमुंबईत आलेल्या परप्रांतीयांची मिळेल ते काम करून आपले बस्तान येथे बसवले आहे. शहरातील लहान मोठे व्यवसाय करून त्यावर ताबा मिळवला आणि आम्ही मात्र मुंबईकर असल्याचा फुकाचा अभिमान बाळगत बसलो.परप्रांतीयांचे आक्रमण हे केवळ मुंबई पुरते मर्यादित राहिलेले नाही. राज्याच्या काना कोपऱ्यात अगदी तालुका, गाव पातळीवरही भाय्यांनी हात पाय पसरले आहेत. परवाच कोकणात गावाकडे गेलो होतो. पहाटे पावणे सहाच्या सुमारास एस.टी. बस स्थानकावर उतरलो. भल्या पहाटे कोकणी माणूस झोपेतून उठलाही नव्हता तेव्हा मला एस.टी.स्थानकावर भय्यांचा वावर दिसला. डोक्‍यावर टोस्ट, बटराच्या पाट्या घेऊन 20 ते 25 भय्ये स्थानकावर जमले होते. सकाळी सहा वाजता एस.स.टी. स्थानकातून गाड्या तालुक्‍यातील गावा गावात रवाना होतात. या गाड्यांमधून हे भय्ये दुर्गम भागात जाऊन तेथे बटर,टोस्ट विकतात. गावात एस.टी. जात असली तरी ती काही अंतरापर्यंतच. तेथून पुढे वाडी वस्तीत जाऊन वजनदार पाटी डोक्‍यावर घेऊन बटर विकावे लागतात. तालुक्‍याच्या ठिकाणची कापडाची दुकाने, गुजराथींची, बेकरी दक्षिण भारतीयांची, इलेक्‍टनिक्‍सची दुकाने सिंधी लोकांची आणि बाजारात येणारी भाजी कोल्हापूर, बेळगावची. भाजी विक्रेतेही तिथलेच. स्थानिक मराठी माणूस केवळ महिन्याला मिळणाऱ्या जागेच्या भाड्याचा धनी. किंवा एखादी टाटा सुमो गाडी घेऊन बेकायदा प्रवासी वाहतूक करायची हा शंभरात दोघा तिघांचा उद्योग. बाकीचे सारे मान्सूनच्य बेभरवशी पावसा सारखीच बेभरवशी शेती पारंपरिक पद्धतीने करणारे. दोन ते तीन महिने काम करून झाले की उर्वरित काळ असाच फुकट दवडायचा. मग सांगा भय्यांनी वा अन्य लोकांनी मेहनत करून पैसे कमावले तर आपण आदळा आपट करून काय कामाची. 'यूपी'हून घरदार सोडून आलेल्या भय्यांना कोकणात रोजगार सापडतो. येथे राहून ते युपीतील आपली कुटुंब पोसू शकतात तर मग स्थानिक माणसाला हा उद्योग का जामत नाही. केवळ जमिनीचे, जागेचे , इमारतीचे भाडे घेऊन किती काळ जगणार. हा प्रश्‍न स्वतः:चाच स्वतः:ला विचारायला हवा.आज बचत गटाच्या माध्यमातून एक चळवळ कोकणातही उभी राहतेय. बचत गटांनी व तरुणांनी विचार करून येथेच रोजगार निमिर्तीचा निर्धार केला तर नक्कीच लहान मोठे उद्योग उभे राहू शकतात. गरज आहे इच्छा शक्तीचे सध्या दक्षिण भारतातील काही लोकांनी कोकणातील, नदी काठच्या , वहाळा काठच्या पडीक जमिनी मोठ्या प्रमाणावर लिजवर घेण्याचा सपाटा लावला आहे. आमचा स्थानिक माणूस एकदम मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासापायी, तर कधी मजबूरीने जमिनी विकतो किंवा करारावर देत आहे. कोकणी माणसाने पडीक ठरवलेल्या जमिनीवर दक्षिण भारतीय माणूस पाले भाजी, फळे यांचे उत्पादन काढतो आणि पैसे कमावतोय. आणि जमिनीचे मूळ मालक आपल्याच जमिनीत दुसऱ्याकडे 80 -90 रुपये रोजात राबवतात असे विदारक चित्र सर्वत्र कोकणात दिसते.महिलांना तर त्याही पेक्षा कमी रोज दिला जातो. एकंदरीतच आमच्या भूमीची किंमत आम्हाला कळलीच नाही. कळली तरी त्यात दीर्घकाळ मेहनत करून सोनं टिकवण्याची मानसिकता नाही. ही पारंपरिक मानसिकता बदलायला हवी. दहावी, बारावी झालं की सरळ मुंबईचा रस्ता धरायचा आणि तेथे दोन तीन हजारात "हापीसात" काम कारचे. बस्स झाले आता. मी उभ्या केलेल्या एखाद्या कंपनीत मी दहा बारा मुले कामाला ठेवीन 100 ते 500 जणांना रोजगार उपलब्ध करून देईन अशी मानसिकता बळावायाला हवी. संकूचीतपणा सोडला पाहिजे. तरच स्वतः:सोबत कोकणाचे कल्याण होऊ शकते. सहकार कधी कोकणात रुजलाच नाही. जमिनींच्या तुकडी कारणामुळे आणि एकंदरीत भौगोलिक स्थितीमुळे शेतीत प्रगती करता आली नाही. कोकणची भूमी पेराल ते उगवण्याची क्षमता असणारी आहे. पाण त्या भूमीचा कधी वापर करता आला नाही. येथील प्रत्येकाच्या गोठ्यात भाकड जनावरांचा भरणाच अधिक, दूध दुभती अर्धा एक लिटर पर्यंतचं. पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक असताना गोठ्यात भरलेला भाताचा पेढा जनावरांना खायला घालायचा अन उन्हाळ्यात चाऱ्याची वानवा निर्माण झालेली असताना जनावरे प्लास्टिकच्या पिशव्या, कागद खात हिंडतात. पशुधनाची योग्य काळजी नाही. साऱ्याच गोष्टीत नियोजनाचा अभाव. गावकी अन्‌ गावकीच्या बॅंकांचा मात्र सुकाळ. वाडीत 15 -20 घरे असतील तर त्यातली 8 बंद, आठ चालू आणि चार विरोधात, एका वाडीत दोन भावक्‍या आणि मंडळे कार्यरत असतात काहीवेळा. कोकणातील हे पारंपरिक चित्र आता काहीसं बदलत असलं तरी जगाच्या तुलनेत त्याचा वेग नगन्यच. निसर्ग सौंदर्याची कोकणावर मुक्त हस्ते उधळण झाली आहे. मोठा सागरी किनारा लाभला आहे. बीचेस आहेत. मात्र त्याचा पर्यटनासाठी आजवर वापर करता आला नाही. हे चित्र बदलायला हवे पर्यटनाच्या विकासाने कोकणात विकासाची गंगा येईल. कोकणात रेल्वे आली पण त्यात रोजगार मिळालेले किती कोकणी आहेत. ज्यांच्या जमिनी रेल्वेत गेल्या त्यांनी त्याचा मोबदला पैशाच्या रूपात घेतला. हा पैसा खाऊन ते मोकळेही झाले. प्रकल्पग्रस्त म्हणून रेल्वेत टी.सी. वैगेरेची नोकरी मिळवली. पण किती जणांनी रेल्वे स्थानकावर स्टॉल मिळावा अशी मागणी केली. याचे उत्तर बहुतांशी नाहीच येईल. रेल्वे स्थानकावरील स्टॉल दक्षिण किंवा उत्तर भारतीयांचे आहेत. रेल्वेस्थानकावर काकडी विकणाऱ्या महिला मला दिसल्या त्यांची सहज चौकशी केली तेव्हा कळले त्या राहणार सांगलीतल्या. बेळगावमध्ये काकडी विकत घेऊन त्या कोकण रेल्वेत विकतात. रत्नागिरीतच कुठे तरी राहून ते हा व्यवसाय करतात. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. हाच व्यवसाय कोकणी माणसाने का करू नये. पावसाळ्याच्या दिवसात तरी कोकणातील गावा गावात काकडी, अन्य भाज्यांचे उत्पन्न निघू शकते. हाच शेत माल जर कोकण रेल्वेत विकला तर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.कोकणच्या मागासलेपणाला येथील मानसिकता कारणीभूत आहेच पाण त्याच बरोबर येथील अपयशी राजकारणी आणि सत्तेवर आजवर आलेली सरकारे कारणीभूत आहेत.बुडत्या बॅंकेवरचा चेक द्यावा तशी कोकण विकासाची पॅकेज जाहीर केली जातात.त्याचा सर्वसामान्य कोकणी माणसाला फायदा किती होतो हे ही एक गौडबंगाल आहे. दुसऱ्याच्या मदतीवर कोणी जागत नाही आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे हेच खरे याची जाणीव प्रत्येकाला झाली.
..................
योगेश पवार

Monday, August 3, 2009

अण्णा आणि आबांमधील दुरावा संपला





मुंबई, ता. 27 : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात निर्माण झालेला दुरावा अखेर दूर झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी साथ न दिल्यामुळे आपण गृहमंत्री असताना पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपींचा तपास लागला नाही, अशी खंत पाटील यांनी आपली भेट घेऊन व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्याबाबत माझ्या मनात कसलीही नाराजी नाही, असे अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांना सांगितले. पवनराजे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी तीन वर्षे लागली. या काळात आर. आर. पाटील गृहमंत्री असतानाही या प्रकरणातील आरोपी सापडू शकले नाहीत. ते पायउतार झाल्यानंतर या प्रकरणात राष्ट्रवादीतून काढून टाकण्यात आलेल्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे नाव आले. तसेच अण्णा हजारेंच्या हत्येच्या सुपारीचा कटही उघड झाला. यावरून आर. आर. पाटील व अण्णा हजारे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. याबाबत अण्णांना आज पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, "आपल्यात व आर. आर. पाटील यांच्यात कसलाही दुरावा नाही', असे स्पष्ट केले. येत्या विधानसभा निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत; मग उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्या प्रचारात सहभागी होऊ, असे हजारे यांनी सांगितले. खासदार राजू शेट्टी, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांच्या पक्षासाठी व आर. आर. पाटील यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

(sakal)

-------------------

Sunday, August 2, 2009

निसर्गाच्या कुशीतला इतिहास




स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या गनिमाच्या उरात त्याने एकेकाळी धडकी भरवली. श्रीमान योगी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने तो पावन झाला अन्‌ मराठी मुलखाची राजधानी म्हणून मिरवला. शिवछत्रपतींच्या झंझावाती युगाचा एक साक्षीदार म्हणून रायगडची ओळख. दुसरं काश्‍मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य कोकणच्या कुशीत वसलेल्या या गडाला इतिहासाबरोबर निसर्गाचंही लेणं लाभलं. निसर्गानं सौंदर्याची त्याच्यावर मुक्त हस्ते उधळण केली आहे. निसर्गाच्या आभूषणांनी नटलेला ओला, हिरवा रायगड सध्या पर्यटक आणि गिर्यारोहकांना साद घालतो आहे.पावसाचा मनमुराद आनंद घेत, त्या शनिवारी आम्ही मित्रांनी रायगडाकडे कूच केली. भल्या पहाटे साडेचार वाजता आम्ही पाचाड खिंड ओलांडून रायगडाच्या पायथ्याशी चित्त दरवाजाजवळ पोचलो. वाटेत निसर्गसौंदर्याचा अद्वितीय नजारा... धरतीचा निरोप घेणारी रात्र जागोजागी धुक्‍यात रेंगाळत होती. त्या अस्पष्ट उजेडातून हळूहळू डांबरी सडक स्पष्ट होत होती. सडकेलगत झाडावरील पानांच्या शेंड्यांतून, सुकलेल्या काटक्‍यांच्या टोकातून निथळणारं दव. दवाच्या थेंबांतून आरपार जाणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे दवाचे मोती बनले. निसर्गाचा हा अचंबित करणारा चमत्कार पाहून रात्रभर प्रवासानं आलेला थकवा कुठल्या कुठे पळाला. आम्ही एकदम फ्रेश झालो. रायगडापासून 22 किलोमीटरवर निसर्गानं आमचं असं जबरदस्त स्वागत केलं. वाटेत लागणाऱ्या खेडेगावांचा, लाल कौलारू घरांचा निरोप घेत जसजसे आम्ही रायगडाकडे जाऊ लागलो, तसतशी ती घरं लहान होत गेली. मध्येच येणाऱ्या धुक्‍याच्या लाटांनी ती कधी कधी पूर्णपणे अदृश्‍य होत. आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो, तेव्हा तर धुकं आणि छत्रपतींच्या रक्षणासाठी छातीचा कोट करणाऱ्या सह्य पर्वताच्या काळ्या पाषाणांचा लपंडाव सुरू होता. धुक्‍याचं पांघरूण झुगारून काही डोंगरमाथे आळोखेपिळोखे देत "उठतो' म्हणत. पण पाच मिनिटं हं.. असं लहान मुलासारखं म्हणून पुन्हा धुक्‍याच्या चादरीत तोंड खुपसून मुरी मारून झोपत. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि डोंगरांना जागो... जागो म्हणत झंझावाती समाचार घेणारे वासुदेवाच्या भूमिकेतले धुक्‍याचे लोळ, सारंच नयनरम्य. शब्दबद्ध न होणारं. धुक्‍याचा हा ढग असा काही बेभानपणे सैर करीत होता, की बघता बघता तो डोक्‍यावरून निघून जात होता आणि मग लक्षात येत होतं, अरे, आपल्या केसांवर, कपड्यांवर दव सांडलंय अन्‌ फुटावरच्या अंतरावरचंही काही दिसत नाहीय. काही क्षणांपूर्वी स्पष्ट दिसणारी कौलारू घरं आणि डोंगरांचे शेंडे धुक्‍यात हरवून जात.
अफझलखानाच्या स्वारीपूर्वी इ.स. 17 व्या शतकात शिवरायांनी रायरीचा किल्ला यशवंतराव मोरे यांच्याकडून जिंकून घेतला. किल्ल्याचं बांधकाम मोरोपंत पिंगळे यांनी केलं. दोन हजार 700 फूट उंचीवर काळ्या कातळांचा हा किल्ला वसला आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी राजधानी म्हणून हा किल्ला छत्रपतींनी चाणाक्षपणे हेरला. "दीड गाव उंच - देवगिरीहून दशगिरीहून दशगुणी उंच जागा, पर्ज्यन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही हे पाहून महाराज म्हणाले, "तख्तास जागा हाच गड करावा' असा बखरीत उल्लेख सापडतो. गडावर चढाई करताना रायगडच्या या वैशिष्ट्यांचा प्रत्यय पावलोपावली येतो. पावसामुळे निसरड्या झालेल्या पायवाटेनं गड चढावा लागतो. डोंगराच्या भल्यामोठ्या कातळी पोटावरून कोसळणारे स्वच्छ, निर्मळ पाण्याचे धबधबे वाटेत भेटतात; तर कुठे कातळाला पाझर फुटून नुसतंच पाणी ठिबकत असतं. वाटेतच धुक्‍याच्या ढगाआडून पाऊस अचानक चाल करून येतो, तेव्हा चांगलीच गाळण उडते. समोरचा रस्ता दिसेनासा होतो. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. वाऱ्याच्या झंझावाताने तोल जाऊन शेकडो फूट दरीत कोसळण्याची भीती असते.गडावर पोचलं, की दृष्टीस पडतो हिरवाकंच शालू नसलेली तांबडी माती आणि नागमोडी पायवाट, काळ्या दगडांनी केलेलं बांधकाम. "अदभुत!' असेच शब्द मुखातून बाहेर पडतात. "खूब लढा बुरूज', "दोन- नाणे' (नाना) दरवाजा, गंगासागर, टकमक टोक, नगारखाना, राण्यांचे महाल, अष्टप्रधान मंडळाची जागा, राजदरबारातील उठबस असणाऱ्या व्यक्तींसाठी असलेला "मीना दरवाजा', महादरवाजा, जगदीश्‍वराचं मंदिर हे सारं पाहिलं, की शिवकालीन देदीप्यमान इतिहासाची पानं डोळ्यांसमोरून झपाझप उलटतात. भोवळ आणणारा हिरकणी कडा पाहिला, की त्या माऊलीच्या धाडसानं मन थक्क होतं. महाराजांचा दरबार आणि त्यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा पाहिला, की छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा कल्पनेनं नजरेसमोर उभा राहतो अन्‌ ऊर अभिमानानं भरून येतो. गडावर फिरताना पावलोपावली भग्न अवशेषांना, दगडांनाही शब्द फुटतात अन्‌ ते शिवरायांची विजयगाथा सांगतात. इतिहास बोलका होतो. शिवराय आज नसले तरी त्यांचं स्थान एकविसाव्या शतकातही प्रत्येकाच्या हदयात कोरलेलं आहे. म्हणूनच अजूनही ऊन-पावसातही मराठी मनं रायगडाची वाट तुडवीतच असतात...
- योगेश पवार