Thursday, October 15, 2009

नेत्यांचे जुने "कनेक्‍शन' "रिडालोस'ला घातक

मुंबई, ता. 10 : "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती'चे घटक असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांचे नेते प्रस्थापित कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांना धडा शिकविण्याची भाषा करीत आहेत; मात्र समितीमधील या नेत्यांचे याच प्रस्थापित पक्षांसोबत असलेले जुने "कनेक्‍शन' त्यांच्या विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत देणारे आहे. त्यामुळे मतदारांसमोर जाताना समितीची कोंडी होऊ शकते.

"रिडालोस'मध्ये सहभागी झालेल्या बहुतांश घटक पक्षांनी सत्तेच्या राजकारणासाठी एक ना अनेक वेळा कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना-भाजप यांच्याबरोबर आघाड्या- युती केल्या आहेत. हेच पक्ष या वेळी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेऊन उभे राहिले आहेत. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात दंड थोपटताना त्यांनी आपले जुने पाश मात्र तोडलेले नाहीत! त्यामुळे या नेत्यांच्या "कथनी आणि करणी'त कुठे फरक तर नाहीना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

शेकाप-शिवसेना "दोस्ताना'
रामशेठ ठाकूर आणि शेकाप यांच्यातील राजकारणात कॉंग्रेसला रायगडमधून संपविण्याच्या ईर्षेने पेटलेल्या "शेकाप'ने श्रीवर्धन विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला मदत केली होती. त्यामुळे शिवसेनेचा विजय झाला. शिवसेना आणि शेकापचा हा "दोस्ताना' रायगड जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणुकीतही कायम राहिला. आघाडी आणि युतीशिवाय येथे कोणा एका पक्षाची डाळ शिजणार नाही. हे माहीत असल्याने शिवसेनेशी युती करण्याचे आमचे धोरण नाही, असे शेकापचे नेते वरकरणी सांगत असले, तरी या निवडणुकीतही हाच फॉर्म्युला छुप्या पद्धतीने राबविला जाण्याची शक्‍यता आहे. "शिवसेनेशी संबंध नाही' असे नेते बोलत असले, तरी रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना- शेकाप यांचे संबंध कायम आहेत. याबाबत शेकापचे सरचिटणीस प्रा. एस. व्ही. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हा परिषदेची मुदत विधानसभा निवडणुकीनंतर संपत असल्याने जिल्हा परिषदेतील पाठिंबा काढला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता "रिडालोस'ची जी भूमिका तीच शेकापची भूमिका राहील, असेही ते म्हणाले.

आठवलेंनाही सत्ता सोडवेना
शिर्डीतील पराभवानंतर माजी खासदार रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर दुगाण्या झाडल्या. कॉंग्रेसला आपली ताकद दाखविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्‍यासह तिसरी आघाडी घडवून आणली; मात्र कॉंग्रेस आघाडीच्या मंत्रिमंडळात असलेले राज्यमंत्री ऍड. प्रीतमकुमार शेगावकर यांचा तसेच महामंडळावर असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांचे राजीनामे त्यांनी घेतले नाहीत. "त्यांचे राजीनामे माझ्या खिशात आहेत,' एवढेच ते सांगत राहिले. त्यामुळे रामदास आठवले हे कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी संबंध ठेवून असल्याचा प्रचार करण्याची संधी भारिप व बसपच्या नेत्यांना मिळत आहे. आठवले यांनी मात्र आपण पुन्हा कॉंग्रेसकडे जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकभारती- विलासराव संबंध?
"लोकभारती'चे आमदार कपिल पाटील यांचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी घनिष्टसंबंध असल्याने त्यांच्याही भूमिकेवर "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती'च्या नेत्यांनी शंका उपस्थित केली होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी प्रताप चिखलीकर यांच्यासोबत ते नांदेडमध्ये गेले होते. लोक भारतीच्या वाट्याला आलेल्या पाच पैकी तीन मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. कपिल पाटील यांच्या मदतीने आणि खासदार राजू शेट्टी यांच्यामार्फत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पश्‍चिम महाराष्ट्रात शह देण्याची विलासरावांची खेळी असल्याची चर्चा आहे; मात्र आपले आणि विलासरावांचे राजकीय नव्हे, तर व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत, कॉंग्रेसच्या प्रवाहात आपण कधीच जाणार नाही, असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीतच "रिडालोस'मधल्या या प्रमुख घटक पक्षांच्या नेत्याचे जुने संबंध या समितीला अडचणीचे ठरण्याची शक्‍यता आहे.
..................

प्रचाराच्या मंचावर रंगली अभिनेत्यांची बारी!

ंमुंबई, ता. 10 : विधानसभा निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून, राज्यात प्रचार शिगेला पोहचला आहे. राजकीय नेत्यांबरोबरच अभिनेतेही आता प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले असून, त्यामुळे एरवीच्या "ब्लॅक अँड व्हाईट' प्रचारसभांमध्ये चांगलाच रंग भरला आहे.

निवडणुकांच्या रणधुमळीत गर्दी खेचण्यासाठी प्रसिध्द अभिनेत्यांना प्रचारात उतरविण्याचा फंडा नवा नाही. यावेळीही मराठी आणि हिंदी चित्रपटातील अनेक अभिनेते कॉंग्रेस आघाडी, युती आणि "रिडालोस'चा झेंडा घेऊन शेवटच्या टप्यात प्रचाराच्या रणमैदानात उतरले आहेत. कॉंग्रेसकडून सर्वाधिक स्टारप्रचारक मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचार करणारा सलमान खान यावेळीही कॉंग्रेसच्या मदतीला धावला आहे. "जवॉ दिलोंकी धडकन' असलेल्या सल्लूमियॉंने मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, लातूर आदी ठिकाणी रोड शो करून मतदारांना आकर्षित केले. सोलापूर येथे प्रणिती शिंदे, तसेच औरंगाबाद येथे राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारासाठी करण्यात आलेल्या रोड शोच्यावेळी सलमानला पाहण्यासाठी आलेल्या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी आपल्या अंगावरील सोन्याचे वजन सावरत प्रचारात उतरले आहेत. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांचा प्रचार त्यांनी केला. उत्तर भारतीयांची "व्होट बॅंक' काबीज करण्यासाठी कॉंग्रेसने भोजपुरी स्टार रवी किशन यांना मुंबई प्रचारासाठी फिरविले; तर हिंदी चित्रपटात स्वतःचे स्थान निर्माण करणारा अभिनेता रितेश देशमुख याने थोरल्या भाऊ, अमितसाठी लातूरमध्ये मतदारांना साकडे घातले. औरंगाबाद मध्ये कॉंग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डांच्या प्रचारात "इक्‍बाल' फेम श्रेयस तळपदेने शाब्दिक गोलंदाजी करीत मतांचा जोगवा मागितला. "जली को आग कहते है...' असा डायलॉग मारत अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात कॉंग्रेसवर आग ओकली. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी झाले. अभिनेत्री स्मृती इराणी, क्रिकेटपटू संजय मांजरेकर, पहिला इंडियन आयडॉल अभिजित सावंत यांनीही युतीचा झेंडा खांद्यावर घेत प्रचारात रंग भरला आहे.

नेता आणि अभिनेता असलेल्या संजय दत्तने समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासाठी "मामू, सायकल पे वोट देना' अशी साद भिवंडीतील मतदारांना घातली. अभिनेत्री जया प्रदा, जया बच्चन आणि सुनील शेट्टी यांनीदेखील समाजवादी पार्टीच्या प्रचारात सहभाग घेतला. मराठीच्या मुद्द्यावर रणांगणात उडी घेतलेल्या मनसेच्या प्रचारासाठी अभिनेता भरत जाधव, "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' फेम सचिन खेडेकर, तसेच अभिनेत्री वर्षा उसगावकर हे स्टार कलाकार पुढे सरसावले आहेत.
नेत्यांच्या त्वेषाने कडाडणाऱ्या मुलूखमैदान तोफा आणि आपल्या उपस्थितीने गर्दी खेचणारे अभिनेते यामुळे निवडणूक ज्वर टीपेला पोहचला आहे...

तिसऱ्या आघाडीची ललकारी निष्प्रभ ठरणार?

ंमुंबई, ता. 26 : जागावाटपाच्या दगडावर आपटून रिपब्लिकन युनाटेडचे फुटलेले जहाज, "शेकाप'चे रायगडात शिवसेनेशी असणारे गुफ्तगु तर अन्य घटक पक्षांचे कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी असलेले लागेबांधे यामुळे "प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात रिडालोसने विधानसभा निवडणुकीत दिलेली ललकारी निष्प्रभ ठरण्याची शक्‍यता आहे.
हातघाईच्या लढाईत अंतिम टप्प्यात स्थानिक तडाजोडींचा धोकाही रिडालोसला आहे.

कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना भाजप या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात लढा देण्यासाठी राज्यात रिपब्लिकन डावी लोकशाही समितीच्या झेंड्याखाली 20 पक्षांची मोट बांधण्यात आली. डाव्या पक्षांच्या तिसऱ्या आघाडीत रिपब्लिकन युनायटेड सामिल होऊन "रिडालोस"च्या झेंड्याखाली सर्वजण एकत्रित आले. काही दिवस बळेबळेच एकत्रित नांदल्यानंतर नेतृत्वाच्या मुद्याचे रिपब्लिकन नेत्यांचे जुने दुखणे उफाळून आले व ऐक्‍याचे वारू प्रत्यक्ष निवडणुकीआधीच फुटले. भारिपचे नेते आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार ऍड्‌. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्‍यात सामील न झाल्याने ऐक्‍य अपूर्णच होते. त्यानंतर एक- एक करत माजी आमदार टी. एम. कांबळे, डॉ. राजेंद्र गवई यांनी रामदास आठवलेंवर शरसंधान केले व बाहेरच रस्ता धरला. रिपब्लिकन ऐक्‍यात आता प्रा. जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले हेच प्रमुख नेते उरले आहेत. त्यामुळे रिपब्लिकन ऐक्‍याचे रूपांतर कवाडे- आठवले युतीत झाले आहे. ऐक्‍याच्या प्रयोगाने व त्यानंतर रिडालोसच्या रूपाने झालेल्या वाटचालीमुळे आंबेडकरी जनतेत काहीसे दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते. परंतु नेत्यांनी पुन्हा इतिहास जागविला आहे. त्यामुळे दलित व आंबेडकरी मतदारांचा नेत्यावरील अविश्‍वास अधिक पक्का होण्यास हातभार लागला आहे. ऐक्‍यातून बाहेर पडलेल्या गटांची फारशी ताकद नसली तरी त्यांच्या बाहेर पडण्यामुळे जनतेत गेलेला संकेत रिब्लिकन चळवळीला घातक ठरणार आहे. शिवाय आंबेडकर, कांबळे, आठवले वेगळे लढल्याने मतांचे विभाजन अटळ आहे.

"शेकाप"चे शिवसेनेशी गुफ्तगू
आमचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही असे शेकापचे ज्येष्ठ नेते एका बाजूला सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शेकाप आणि शिवसेनेत रायगड मध्ये स्थानिक पातळीवर जागा वाटपातही तडजोडी झाल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत शेकापने केलेल्या मदतीची परतफेड शिवसेना रायगडातील चार मतदारसंघात शेकापला मदत करून करणार आहे. तर शेकापनेही शिवसेना लढत असलेल्या श्रीवर्धन, महाडमध्ये आपले उमेदवार उभे न करता मदत करण्याचे ठरवले आहे. शेकाप हा रिडालोसचा प्रमुख घटक पक्ष आहे. आमदार कपिल पाटील यांनी मागितलेल्या 9 पैकी बहुतांशी मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यामुळे पाटील यांची ही "विलासी" खेळी असल्याची चर्चा घटक पक्षातच सुरू आहे. राजू शेट्टी यांचे पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस "लक्ष्य" आहे. राष्ट्रवादीला मात देण्यासाठी शेट्टी स्थानिक तडजोडी करताना प्रस्थापित राजकीय पक्षांचीच मदत घेण्याची शक्‍यता आहे. एकूणच प्रस्थापितांना विरोध करणारे प्रस्थापितांच्याच भोवती रेंगाळत आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीला मतदारांचा किती प्रतिसाद देणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.